नागपूर : महिला आरक्षण विधेयक आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत भाजपवर जोरदार टीका केली आहे.
नागपूर प्रेस क्लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना वडेट्टीवार यांनी सांगितले की, 106 वी घटना दुरुस्ती मंजूर झाल्यानंतर महिला आरक्षणाला कायदेशीर मान्यता मिळाली आहे. तरीही त्याची अंमलबजावणी लांबवण्यासाठी जनगणना आणि परिसीमनाच्या अटी जोडल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
त्यांच्या म्हणण्यानुसार, “महिला आरक्षण आधीच मंजूर असताना पुन्हा नव्या अटी का लादल्या जात आहेत, हा मोठा प्रश्न आहे.” सरकारकडून आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत विलंब केला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
वडेट्टीवार यांनी पुढे सांगितले की, लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना आणि आरक्षण प्रक्रियेत राजकीय हेतू दिसत असून त्याचा परिणाम लोकशाही प्रक्रियेवर होत असल्याचा आरोप आहे.
राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी वाढत्या करांमुळे सामान्य नागरिकांवर भार वाढत असल्याचे सांगितले. तसेच विविध धोरणांवरूनही त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
या पत्रकार परिषदेमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

