मुंबई : महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपली रणनीती स्पष्ट करत १० जागांसाठी ३० संभाव्य उमेदवारांची यादी केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली आहे. या निर्णयामुळे पक्षात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा स्पष्ट संकेत मिळत आहे.
पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेत, अलीकडील लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत झालेल्या नेत्यांना पुन्हा विधान परिषदेतून संधी न देण्याची भूमिका घेण्यात आली. त्यामुळे ‘मागच्या दाराने’ पुनरागमनाचा मार्ग बंद करण्यात आल्याचे दिसते.
सूत्रांच्या माहितीनुसार, जनाधार गमावलेल्या नेत्यांना पुन्हा संधी देणे संघटनेच्या दृष्टीने योग्य संदेश देणार नाही, असे मत बैठकीत मांडण्यात आले. याऐवजी निष्ठावान कार्यकर्ते आणि नव्या नेतृत्वाला पुढे आणण्यावर भर देण्यात आला आहे.
दिल्लीकडे पाठवलेल्या यादीत माधवी नाईक, दयाशंकर तिवारी, डॉ. उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक, केशव उपाध्याय, रवी अनासपुरे, राजेश पांडे, राम सातपुते, रणजितसिंग निंबाळकर, संजय काका पाटील, विवेक कोल्हे, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी यांसारख्या नावांचा समावेश आहे.
या ३० नावांमधून अंतिम १० उमेदवारांची निवड केली जाणार असून, त्यातील काही नावे राज्य नेतृत्वाच्या शिफारशीनुसार तर काही केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णयानुसार निश्चित होणार आहेत. या प्रक्रियेमुळे पक्षातील अंतर्गत राजकारणाला नव्या दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

