नाशिकमध्ये गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत असून, या प्रकरणातील धक्कादायक खुलाशांमुळे तपास अधिक गंभीर वळणावर गेला आहे. महिला शोषण, धार्मिक भावनांचा गैरवापर आणि कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक व्यवहारांचे आरोप समोर आल्यानंतर प्रशासन आणि सहकारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर समता नागरी पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे यांनी राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यभर सुमारे १५ हजार पतसंस्थांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या फेडरेशनमध्ये सुमारे ६ हजार सभासदांचा समावेश आहे.
अशोक खरातशी संबंधित आर्थिक व्यवहार आणि शेकडो संशयास्पद खात्यांबाबत चौकशी सुरू असल्याने समता पतसंस्थेवर दबाव वाढला आहे. शिर्डी येथील शाखेत आढळलेल्या संशयित खात्यांमध्ये काही राजकीय व्यक्तींच्या नातेवाईकांचीही खाती असल्याचे समोर आले आहे. यामध्ये मोठ्या आर्थिक उलाढाली झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, शिर्डी पोलिसांकडून या प्रकरणातील सुमारे १०० संशयित खात्यांची सखोल तपासणी सुरू आहे. काही खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित पतसंस्थेच्या आर्थिक कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याच प्रकरणात चौकशीदरम्यान काही राजकीय संबंधांवरही चर्चा सुरू झाल्याने वातावरण तापले आहे. दुसरीकडे, संबंधित व्यक्तींनी आपल्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळत, खाती व स्वाक्षऱ्या बनावट असल्याचा दावा केला आहे.
अशोक खरात प्रकरणामुळे सहकारी पतसंस्था क्षेत्रात मोठी खळबळ निर्माण झाली असून, पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

