नागपूर :राज्यात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम नागपूरचे आमदार आणि नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सायबर गुन्ह्यांमधून फसवणूक झालेल्या रकमेपैकी केवळ २ टक्केच रक्कम परत मिळत असल्याची बाब गंभीर असल्याचे सांगत, या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी खर्च करण्यात आलेल्या सुमारे २,००० कोटी रुपयांचा नेमका उपयोग काय झाला, असा सवाल त्यांनी केला.
मुंबईत सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करताना ठाकरे म्हणाले की, राज्यात दररोज अनेक नागरिक सायबर फसवणुकीचे बळी ठरत आहेत. मात्र अशा प्रकरणांत पीडितांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
सायबर गुन्हे रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला असल्याचे सांगितले जाते. मात्र त्याचा ठोस परिणाम नागरिकांना का जाणवत नाही, असा प्रश्न उपस्थित करत ठाकरे यांनी सरकारकडून स्पष्ट उत्तराची मागणी केली.
दरम्यान, यावर उत्तर देताना संबंधित मंत्र्यांनी राज्यातील नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती वाढवण्यासाठी दर महिन्याला सुमारे २१ कोटी संदेश पाठविण्याची योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच जागरूकता मोहिमेसाठी ३४ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
यावेळी ठाकरे यांनी केवळ ‘गोल्डन अवर’ची घोषणा करून प्रश्न सुटणार नाही, असे स्पष्ट केले. सायबर फसवणूक होण्यापूर्वीच नागरिकांना सतर्क करणारी रिअल-टाइम अलर्ट प्रणाली, जलद तपास प्रक्रिया आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हेगारांपर्यंत त्वरित पोहोचणारी यंत्रणा उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.जनतेचा कष्टाचा पैसा सुरक्षित ठेवणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे सांगत सायबर गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही ठाकरे यांनी केली.

