नवी दिल्ली : आम आदमी पार्टीमध्ये अचानक घडलेल्या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पक्षाचे 7 राज्यसभा खासदारांनी तडकाफडकी पक्ष सोडत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने आपला मोठा फटका बसला आहे.
या पार्श्वभूमीवर आपचे खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका मांडली. त्यांनी या प्रकारामागे भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ असल्याचा गंभीर आरोप करत, हे लोकशाहीला धक्का देणारे राजकारण असल्याचे म्हटले. “भाजपने आमचे 7 खासदार तोडले आहेत. पंजाबची जनता हा प्रकार कधीच विसरणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी त्यांनी राघव चड्ढा यांच्यासह इतर नेत्यांवरही टीका केली. “पक्षाने आणि मतदारांनी त्यांना मोठे केले, महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या. मात्र त्यांनी आता त्या विश्वासाला तडा दिला,” असे संजय सिंह म्हणाले. त्यांनी संदीप पाठक, अशोक मित्तल आणि स्वाती मालिवाल यांचा उल्लेख करत नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, भाजपमध्ये प्रवेशाची घोषणा करताना राघव चड्ढा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “काही काळापासून मी पक्षाच्या कार्यापासून दूर होतो. काही निर्णयांशी माझा मतभेद होता. त्यामुळे राजकारण सोडणे किंवा सकारात्मक दिशा निवडणे हे दोन पर्याय आमच्यासमोर होते. त्यातूनच आम्ही भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला,” असे त्यांनी सांगितले.या घडामोडींमुळे देशातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

