मुंबई : राज्यातील विधान परिषद निवडणुका जवळ येत असताना राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ या अधिकृत निवासस्थानी मध्यरात्री भेट घेतल्याची चर्चा रंगली आहे. या संभाव्य भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात उलथापालथीच्या चर्चांना उधाण आले आहे.
या संदर्भात ‘प्रबुद्ध भारत’ या माध्यम संस्थेने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे या चर्चेला अधिक हवा मिळाली. सूत्रांच्या माहितीनुसार दोन्ही नेत्यांमध्ये गोपनीय चर्चा झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या भेटीचा अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही.
सुसंवादाची नवी सुरूवात?
गेल्या काही वर्षांत राजकीय मतभेदांमुळे ठाकरे आणि फडणवीस यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. २०१९ च्या सत्तांतरानंतर दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सूर कायम राहिला. मात्र, अलीकडेच एका सार्वजनिक कार्यक्रमात दोघांनीही एकमेकांप्रती आदर व्यक्त करत हलक्या-फुलक्या शैलीत संवाद साधला होता. त्यामुळे पुन्हा संवादाचे दरवाजे उघडत असल्याचे संकेत मिळत होते.
विधान परिषद निवडणुकीची पार्श्वभूमी-
सध्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलत आहेत. ठाकरे हे या निवडणुकीत स्वतः उमेदवारी देण्यास उत्सुक नसल्याच्या चर्चांदरम्यान ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. महाविकास आघाडीसमोर मर्यादित जागा असल्याने उमेदवारीच्या निर्णयाचा थेट परिणाम निकालावर होऊ शकतो.
राजकीय गणितांचे संकेत?
राजकीय विश्लेषकांच्या मते, जर ठाकरे विधान परिषदेत गेले, तर ते एकनाथ शिंदे यांच्या गटाला थेट राजकीय आव्हान देऊ शकतात. दुसरीकडे, भाजपलाही या समीकरणातून अप्रत्यक्ष फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या चर्चांवर प्रतिक्रिया देताना, “या भेटीबाबत नेमकी माहिती फक्त संबंधित दोन्ही नेतेच देऊ शकतात,” असे सांगत उत्सुकता कायम ठेवली आहे.
एकूणच, या कथित भेटीमुळे राज्यातील राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल लागली असून, येत्या काही दिवसांत याबाबत अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे.

