नागपूर : शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या कामावरून नागपूर महानगरपालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, ‘दंड-परतावा’ प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले आहे. पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी मनपावर थेट आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करत प्रशासनाला जाब विचारला आहे.
ठाकरे यांच्या आरोपानुसार, कचरा व्यवस्थापनाशी संबंधित दोन खासगी ऑपरेटर्सकडून कोट्यवधींचा दंड वसूल करण्यात आला. मात्र त्याच कंपन्यांना विविध कामांच्या नावाखाली त्यापेक्षाही अधिक रक्कम परत करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे हा संपूर्ण व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार दाखल करत संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित कंपन्यांचे करार रद्द करून संपूर्ण व्यवहाराची सखोल चौकशी व्हावी, अशीही त्यांनी भूमिका मांडली.
कचरा व्यवस्थापनासाठी गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात निधी खर्च करूनही शहरात अपेक्षित सुधारणा दिसून आलेली नाही, असा आरोप करत ठाकरे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. करारानुसार जबाबदाऱ्या खासगी ऑपरेटर्सवर असतानाही अनेक कामे मनपानेच केल्याने सार्वजनिक निधीचा अपव्यय झाला, असा आरोप त्यांनी केला.
या सर्व घडामोडींमुळे नागपूर मनपाचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला असून, या प्रकरणात सरकार कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

