मुंबई : राज्यात सध्या हवामानाचे दोन टोकाचे चित्र पाहायला मिळत आहे. एका बाजूला विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची तीव्र लाट उसळली असून तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे, तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा धोका निर्माण झाला आहे.
अकोला, वाशिमसारख्या जिल्ह्यांत तापमान ४२ अंशांच्या पुढे गेले असून पुढील ३ ते ४ दिवसांत उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नागरिक प्रचंड उकाडा आणि उष्णतेमुळे हैराण झाले आहेत.
दरम्यान, हवामान खात्याने राज्याच्या विविध भागांसाठी पावसाचा इशाराही दिला आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात २४ व २५ एप्रिल रोजी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
विदर्भात २८ एप्रिल रोजी ३० ते ५० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कोंकण आणि गोव्यातही काही भागांत हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामानातील या अचानक बदलामुळे प्रशासन सतर्क झाले असून नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. दुपारच्या कडाक्याच्या उन्हात बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी आणि द्रवपदार्थांचे सेवन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी हलकी सिंचन करणे, जमिनीतील आर्द्रता टिकवण्यासाठी मल्चिंगचा वापर करणे, तसेच नवीन लागवडींना ‘शेड नेट’ने संरक्षण देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
वादळी वाऱ्यामुळे झाडे व पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने हवामानाच्या अंदाजावर लक्ष ठेवून सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

