समुद्रावर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्था, हवामान व उपजीविकेसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन अत्यावश्यक - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
गोवा २३ फेब्रुवारी : सीएसआयआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, दोना पावला येथे WOSC-2026 (World Ocean Science Congress) या जागतिक महासागर विज्ञान परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. महासागर विज्ञान, हवामान बदल, सागरी सुरक्षा आणि ब्ल्यू इकॉनॉमी या विषयांवर विचारमंथन करण्यासाठी देश-विदेशातील अग्रगण्य शास्त्रज्ञ, संशोधक आणि तज्ज्ञ या परिषदेत सहभागी झाले आहेत.
चार दिवस चालणाऱ्या या परिषदेत मुख्य व्याख्याने, तांत्रिक सत्रे, पोस्टर सादरीकरणे आणि विषयानुसार कार्यशाळांद्वारे महासागर विज्ञान, शाश्वत किनारी विकास आणि सागरी प्रशासनासमोरील नव्या आव्हानां व संधींचा आढावा घेतला जाणार आहे. याशिवाय मच्छीमारांचा मेळावा, महिला समुद्रशास्त्रज्ञांची बैठक तसेच सुमारे ६०० हायस्कूल विद्यार्थ्यांचा सहभाग असलेला संवाद कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.
गोव्याची सशक्त सागरी संशोधन व्यवस्था आणि सुमारे १९३ किलोमीटर लांबीचा किनारा यामुळे ही जागतिक परिषद आयोजित करण्यासाठी गोवा हे नैसर्गिक केंद्र ठरते. सागरी जैवतंत्रज्ञान, पाण्याखालील तंत्रज्ञान आणि किनारी संशोधन या क्षेत्रांत राज्यातील संस्थांचे महत्त्वपूर्ण योगदान असून त्यामुळे भारताच्या महासागर विज्ञान क्षेत्रात गोव्याची भूमिका अधिक बळकट झाली आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, समुद्र हा गोव्याच्या अर्थव्यवस्था, मत्स्यव्यवसाय, पर्यटन आणि हवामान नमुन्यांचा केंद्रबिंदू असून हजारो कुटुंबे त्यांच्या उपजीविकेसाठी समुद्रावर अवलंबून आहेत. भारतातील सुमारे एक चतुर्थांश लोकसंख्या किनारी भागात राहते, याकडे लक्ष वेधून त्यांनी ब्ल्यू इकॉनॉमीचा विकास वैज्ञानिक ज्ञान, जबाबदार धोरणे आणि शाश्वत पद्धती यांच्या आधारावरच व्हायला हवा, असे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महासागर विज्ञान आणि सागरी पायाभूत सुविधांना विकसित भारताच्या दिशेने नवी गती मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दीर्घकालीन सागरी संवर्धन आणि आर्थिक स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी संशोधन संस्था, धोरणनिर्माते आणि किनारी समुदाय यांच्यात सातत्यपूर्ण सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नवकल्पना आणि स्वदेशी तंत्रज्ञानाच्या गरजेवर भर देत, गोव्यातील या परिषदेत होणाऱ्या चर्चांमुळे राष्ट्रीय आणि जागतिक सागरी प्रशासनाच्या धोरणांना अर्थपूर्ण दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास प्रा. सुनीलकुमार सिंग (अध्यक्ष, राष्ट्रीय आयोजन समिती व संचालक, CSIR-NIO), डॉ. सतीश चंद्र शेणोई (उपाध्यक्ष, विज्ञान भारती), डॉ. थंबन मेलोथ (संचालक, नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च), डॉ. एम. रविचंद्रन (सचिव, पृथ्वी विज्ञान मंत्रालय), श्री. पी. ए. विवेकानंद पै (महासचिव, विज्ञान भारती) तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

