मुंबई : महाराष्ट्रात सध्या हवामानाचा लहरीपणा प्रकर्षाने जाणवत असून पाऊस, थंडी आणि उकाडा यांचा विचित्र मेळ पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, जानेवारी महिन्याच्या शेवटच्या टप्प्यातही पावसाची शक्यता कायम असून राज्यातील काही जिल्ह्यांसाठी अवकाळी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर हवामानात सातत्याने बदल होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. उत्तर भारतात शीतलहरींमुळे थंडीचा जोर कायम असला तरी महाराष्ट्रात मात्र गारठा लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्याने तापमानात वाढ नोंदवली जात आहे.
मॉन्सून संपून अनेक महिने झाले असतानाही पावसाची सक्रियता कायम आहे. देशातील विविध भागांत ढगांची निर्मिती सुरू असून त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावरही होत आहे. या सतत बदलणाऱ्या परिस्थितीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
पुणे शहरात सध्या थंडीची तीव्रता ओसरली असून उकाडा जाणवू लागला आहे. मागील काही दिवसांत किमान तापमानात वाढ झाली असून कमाल तापमानात किंचित घट नोंदवण्यात आली आहे. परिणामी, थंडी कमी झाली असली तरी दमट वातावरणामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील अनेक भागांत पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. या ढगाळ हवामानामुळे उष्णता वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या बहुतांश भागांत किमान तापमान ११ अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले जात असून, काही दिवसांपूर्वी ५ ते ६ अंशांपर्यंत घसरलेला पारा आता वाढताना दिसत आहे.
दरम्यान, धुळे, पालघर, नाशिक, जळगाव, नंदूरबार, अहिल्यानगर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. येत्या काही दिवसांत हवामानात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता असून, जानेवारी अखेरीसही पावसाची शक्यता कायम असल्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

