मुंबई: बारामतीतील विमान अपघातानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार गट) कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी आमदार रोहित पवार यांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. रोहित पवार यांनी अपघातासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे त्यांना संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे राज्य सरकारने तातडीने सुरक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
सुळे यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया माध्यमावरून सरकारला थेट आवाहन करत, लोकप्रतिनिधींना निर्भयपणे मत मांडता यावे यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले.
अपघातानंतर संशयाचे सावट-
२८ जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह चार जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अपघाताच्या कारणांबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.
रोहित पवार यांनी सलग पत्रकार परिषदांमधून या अपघातात काही अनियमितता असू शकते, असा संशय व्यक्त केला आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
पारदर्शक चौकशीची अपेक्षा-
सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, या दुर्घटनेविषयी जनतेच्या मनात अनेक प्रश्न आहेत. चौकशी प्रक्रियेत विलंब किंवा माहितीचा अभाव राहिल्यास लोकांमध्ये अविश्वास निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संपूर्ण घटनेची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी होणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर, रोहित पवार हे जनतेच्या शंका आणि भावना पुढे मांडत आहेत. अशा परिस्थितीत त्यांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही राज्य सरकारची कर्तव्य आहे, असे सांगत सुळे यांनी सरकारने तत्काळ योग्य ती पावले उचलावीत, असा इशारा दिला.

