बुलढाणा : भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने महाराष्ट्रातील शेगाव येथे २५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ‘राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळा २०२६’ आयोजित करण्यात येणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या राष्ट्रीय स्तरावरील आरोग्य मेळ्याचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी शेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
संत गजानन महाराजांच्या पावन भूमीत होणाऱ्या या मेळ्याला महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्राताई पवार, बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंदआबा पाटील, सहपालकमंत्री संजय सावकारे, राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर, आमदार डॉ. संजय कुटे, अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन ट्रस्टचे अध्यक्ष पद्मश्री–पद्मविभूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा, तसेच महासंमेलनचे अध्यक्ष वैद्य प्रा. राकेश शर्मा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या मेळ्याचे आयोजन अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या माध्यमातून करण्यात येत असून, या संस्थेची स्थापना १९०७ साली त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र) येथे झाली होती. ही देशातील सर्वात जुनी व मोठी आयुर्वेदिक संस्था आहे. आयोजन समितीचे अध्यक्षपद महासंमेलनचे उपाध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. महासंमेलनाने आतापर्यंत २२ राज्यस्तरीय व ३ राष्ट्रीय आरोग्य मेळ्यांचे यशस्वी आयोजन केले आहे.
या राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळ्याचा मुख्य उद्देश आयुर्वेद, युनानी, सिद्धा, सोवा-रिग्पा, होमिओपॅथी, निसर्गोपचार आणि योग या आयुष उपचारपद्धतींचा प्रचार व प्रसार करणे हा आहे. मेळ्याच्या चारही दिवसांत नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी, उपचार आणि औषध वितरण करण्यात येणार आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्याख्यानांतून आरोग्यविषयक मार्गदर्शनही दिले जाणार आहे.
या उपक्रमाचा विशेष लाभ बुलढाणा जिल्ह्यासह परिसरातील शेतकऱ्यांनाही होणार आहे. औषधी वनस्पतींच्या लागवडीविषयी मार्गदर्शन देण्यात येणार असून, शेतकऱ्यांना वनऔषधी शेतीतून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
मेळ्यात देशभरातील नामवंत आयुष औषधनिर्मिती कंपन्या सहभागी होणार असून, GMP मानकांनुसार औषधनिर्मिती व आयुर्वेदातील नव्या संशोधनाची माहिती दिली जाणार आहे. आयुष औषध उत्पादकांसाठी विशेष कार्यशाळांचे आयोजनही करण्यात येणार आहे. तसेच वनऔषधी प्रदर्शनाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना स्थानिक औषधी वनस्पतींमधून स्वस्त व प्रभावी उपचारांची माहिती मिळणार आहे.
पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आयुष मंत्रालयाच्या महत्त्वपूर्ण यशांची माहिती दिली. ‘देश का प्रकृती परीक्षण अभियान’ अंतर्गत १.३९ कोटी नागरिकांनी सहभाग घेतला, फेब्रुवारी २०२५ मध्ये ५ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित झाले. डिसेंबर २०२५ मध्ये दिल्लीत WHOच्या सहकार्याने पारंपरिक वैद्यकशास्त्रावरील दुसरी जागतिक परिषद पार पडली, तर जून २०२५ मध्ये विशाखापट्टणम येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ३ लाखांहून अधिक नागरिकांनी एकत्र योग साधना करत ५ गिनीज रेकॉर्ड नोंदवले, अशी माहिती त्यांनी दिली.
आयुष औषधे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी देशभरात आयुष औषधी केंद्रांची उभारणी सुरू असून, आयुष उपचार पॅकेज आयुष्मान भारत योजनेत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

