विज्ञान भारतीच्या विदर्भ विज्ञान महोत्सव व प्रदर्शनाचे नागपुरात भव्य उद्घाटन
नागपूर :विज्ञान म्हणजे केवळ एआय किंवा आयटी क्षेत्रातील मनुष्यबळ घडविण्यापुरते मर्यादित नसून, नव्या संकल्पना, संशोधन आणि शोधांची सर्जनशील वाटचाल आहे. हजारो वर्षांची वैज्ञानिक परंपरा लाभलेल्या भारताचा पाया अत्यंत भक्कम असून, याच बळावर देशाची सर्वांगीण प्रगती साधता येईल, असे मत राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले.
विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ व धरमपेठ एम. पी. देव स्मृती विज्ञान महाविद्यालय (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय विदर्भ विज्ञान महोत्सव व विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी अंबाझरी तलाव परिसरातील महाविद्यालयात लोढा यांच्या हस्ते पार पडले.
भारताने जगाला ‘शून्य’ ही अमूल्य देणगी दिली असून भारतीय समाजाची विचारधारा मुळातच वैज्ञानिक आहे, असे लोढा म्हणाले. समाजासाठी काम करणारा सामान्य नागरिक आत्मविश्वासाने पुढे गेला, तर देश निश्चितच विकसित राष्ट्र बनेल. स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्यांच्या अपेक्षांनुसार भारत घडविण्याचे महत्त्वाचे कार्य विज्ञान भारती करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यावेळी विद्यार्थ्यांना व्यासपीठावर बोलावून त्यांचे विचार ऐकून घेतले.
उद्घाटन सोहळ्याला पीडब्ल्यूडी नागपूर विभागाचे मुख्य अभियंता एस. एस. माने, लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य, विज्ञान भारतीचे क्षेत्र संघटन मंत्री श्रीप्रसाद जी, संरक्षक डॉ. सतीश वटे, धरमपेठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उल्हास औरंगाबादकर, सचिव प्रकाश इटनकर, प्राचार्य डॉ. अखिलेश पेशवे तसेच अतुल मोघे उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणात उल्हास औरंगाबादकर यांनी विद्यार्थ्यांनी समाजातील प्रश्नांचा अभ्यास करून प्रयोगशीलतेतून ज्ञान मिळवावे, असे आवाहन केले. एस. एस. माने यांनी शुभेच्छा दिल्या, तर डॉ. अतुल वैद्य यांनी विज्ञानाचा गैरवापर टाळून त्याचा योग्य प्रचार व प्रसार होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.
या विज्ञान प्रदर्शनात नागपूर जिल्ह्यातील बी.एस्सी. आणि एम.एस्सी. विद्यार्थ्यांचे सुमारे ४० प्रकल्प मांडण्यात आले. तसेच विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये ‘क्लायमेट चेंज’, ‘वन हेल्थ’ आणि ‘डिफेन्स’ या विषयांवर आधारित रांगोळी, पोस्टर, विज्ञान मॉडेल आणि नाटिका स्पर्धांच्या अंतिम फेऱ्या येथे पार पडल्या.
कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. कीर्ती पातुरकर आणि रुमा कापरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, एनसीसी कॅडेट्स आणि राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
विज्ञान भारतीशी सामंजस्य करार
विज्ञान चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक जयंतराव सहस्रबुद्धे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २८ फेब्रुवारी हा दिवस यापुढे ‘जयंतराव सहस्रबुद्धे विज्ञान दिन’ म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय तातडीने जाहीर केला जाईल. तसेच शिक्षकांमध्ये विज्ञानविषयक जनजागृतीसाठी विज्ञान भारतीने राज्य सरकारशी सामंजस्य करावे; यासाठी ५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल, अशी घोषणा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली.

