मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या दिशेने सरकारने पाऊल टाकले आहे. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत लक्षणीय वाढ करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विधान परिषदेत दिली.
सध्याच्या योजनेनुसार इयत्ता पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांना दरमहा ६० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. ही रक्कम वाढवून २५० रुपये करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. तसेच इयत्ता आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी मिळणारी दरमहा १०० रुपयांची शिष्यवृत्ती वाढवून ४०० रुपये करण्याबाबत शासनस्तरावर कार्यवाही सुरू आहे.या संदर्भात आमदार सतीश चव्हाण , विक्रम काळे , अरुण लाड आणि सचिन अहिर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करत शिष्यवृत्ती वाढीबाबत सरकारची भूमिका जाणून घेतली होती. त्यावर उत्तर देताना मंत्र्यांनी ही माहिती दिली.

