मालेगाव : गिरणा सहकारी साखर कारखान्यातील कथित १७८ कोटींच्या शेअर्स घोटाळ्याच्या आरोपांवरून रंगलेला वाद अखेर निवळला आहे. संजय राऊत यांनी व्यक्त केलेल्या आरोपांमुळे निर्माण झालेल्या प्रकरणात दादा भुसे यांनी दाखल केलेला अब्रुनुकसानीचा खटला मागे घेतला असून, दोन्ही नेते आज प्रथमच एकत्र माध्यमांसमोर आले.
गिरणा सहकारी साखर कारखान्याच्या व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. त्यांचा थेट निशाणा मंत्री दादा भुसे यांच्यावर होता. या आरोपांमुळे व्यथित झालेल्या भुसे यांनी मालेगावच्या अतिरिक्त मुख्य न्यायादंडाधिकाऱ्यांकडे अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. मागील सुनावणीत राऊत अनुपस्थित राहिल्याने न्यायालयाने त्यांना १२ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.मात्र आजच्या सुनावणीत दोन्ही नेते न्यायालयात हजर झाले. यावेळी भुसे यांनी खटला मागे घेतल्याची घोषणा केली आणि त्यामुळे राऊत यांना मोठा दिलासा मिळाला.
माध्यमांसमोर एकत्रित उपस्थिती-
२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेनंतर प्रथमच शिंदेसेनेचे नेते आणि राऊत एकत्र दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
यावेळी राऊत म्हणाले, दादा भुसे आणि आमच्यातील वाद संपला आहे. ज्यांच्या माहितीनुसार मी वक्तव्य केले होते, ते आता सत्ताधारी पक्षात गेले आहेत. त्यामुळे या विषयावर पुढे वाद घालण्यात अर्थ नाही. माझ्याकडून चुकीच्या माहितीच्या आधारे वक्तव्य झाले, हे कालांतराने लक्षात आले. दादा भुसे यांनी मोठेपणा दाखवत हा विषय संपवण्यासाठी सहकार्य केले.राऊत यांनी तब्येतीच्या कारणामुळे न्यायालयीन तारखांना उपस्थित राहणे अवघड होत असल्याचेही नमूद केले.
‘सभासद शेतकऱ्यांचा अवमान’-
दादा भुसे यांनी सांगितले की, गिरणा साखर कारखान्याच्या व्यवहाराबाबत दैनिकातील बातम्यांमुळे मालेगाव व परिसरातील ११ हजार सभासद शेतकऱ्यांचा अवमान झाला. कारखाना विक्री प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांनी ११०० रुपये प्रति शेअर प्रमाणे भांडवल उभारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अफवांमुळे अपेक्षित रक्कम जमा होऊ शकली नाही.
जमा झालेली १.७८ कोटी रुपयांची रक्कम संबंधित कंपनीला आरटीजीएसद्वारे हस्तांतरित केल्याचे सर्व व्यवहार नोंदीवर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“राऊत यांनी मालेगावच्या शेतकरी सभासदांची माफी मागितली आहे. त्यांच्या दिलगिरीनंतर आणि तब्येतीचा विचार करून आम्ही खटला मागे घेतला,” असे भुसे यांनी सांगितले.या घडामोडींमुळे गेल्या काही महिन्यांपासून गाजत असलेल्या या वादावर अखेर पडदा पडला असून, दोन्ही बाजूंनी समेटाचा सूर लावल्याने राजकीय वातावरणात वेगळीच चर्चा रंगली आहे.

