नवी भरती १५ जूनपूर्वी
मुंबई : राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षक व्यवस्थेवर मोठा परिणाम करणारी संचमान्यता प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. १५ मार्च २०२४ रोजी शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या नव्या शासन निर्णयानुसार राज्यातील सुमारे ११ हजार शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये प्राथमिक शाळांतील सुमारे ६ हजार तर माध्यमिक शाळांतील सुमारे ५ हजार शिक्षकांचा समावेश आहे.
राज्यातील सुमारे ८० हजार जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका शाळा व खासगी अनुदानित प्राथमिक शाळा, तसेच १७ हजार माध्यमिक शाळांची संचमान्यता आता नव्या निकषांनुसार अंतिम करण्यात आली आहे.
शासन निर्णयाला न्यायालयाची मान्यता-
१५ मार्च २०२४ रोजी संचमान्यतेचे नवे निकष जाहीर झाल्यानंतर शिक्षक संघटनांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने शासनाचा निर्णय ग्राह्य धरला. त्यामुळे २०२४-२५ या वर्षातील संचमान्यतेची प्रक्रिया रखडली होती. आता २०२४-२५ आणि २०२५-२६ या दोन्ही वर्षांची संचमान्यता नव्या शासन निर्णयानुसार पूर्ण करण्यात आली आहे.
१३ फेब्रुवारीपासून समायोजन प्रक्रिया-
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे १३ फेब्रुवारी ते ३० एप्रिल या कालावधीत समायोजन केले जाणार आहे. त्याआधी आक्षेप-हरकती मागवून त्यावर सुनावणी घेतली जाईल आणि अंतिम आदेश दिले जातील. प्रथम जिल्हास्तरावर, त्यानंतर विभागीय स्तरावर शिक्षकांचे समायोजन होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
संचमान्यतेतील ठळक निकष-
इयत्ता १ ते ५ : २० ते ६० पटसंख्येसाठी २ शिक्षक पदे
तिसऱ्या पदासाठी किमान ७६ पटसंख्या, १०६ पेक्षा कमी पटसंख्येला चौथे पद नाही
२१० पटसंख्येवर प्रत्येक ३० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक
इयत्ता ६ ते ८ : १० ते ३५ पटसंख्येला १, तर ३६ ते ७० पटसंख्येला २ पदे
इयत्ता ९ व १० : २० ते ३० पटसंख्येला १ पद, त्यापेक्षा कमी पटसंख्येचे वर्ग बंद
‘बोर्ड परीक्षा झाल्यावरच प्रत्यक्ष समायोजन’
माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक महेश पालकर यांनी सांगितले की, संचमान्यता अंतिम करण्यात येत असून अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचे आदेश काढण्यात आले आहेत. मात्र, दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षा संपल्यानंतरच प्रत्यक्ष समायोजन सुरू होईल.
नवी शिक्षक भरती १५ जूनपूर्वी
सध्या राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये १८ हजारांहून अधिक शिक्षक पदे रिक्त आहेत. नव्या भरतीपूर्वी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण केले जाईल. शालेय शिक्षण विभागाच्या नियोजनानुसार १५ जूनपूर्वी शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जाणार असली तरी, नव्या निकषांमुळे अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढल्याने फक्त ७ ते ८ हजार शिक्षकांचीच नवी भरती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.नव्या संचमान्यतेमुळे शिक्षकांमध्ये अस्वस्थता वाढली असली तरी, शासन मात्र गुणवत्ता व विद्यार्थीसंख्येनुसार शिक्षक व्यवस्थेचा आग्रह धरत आहे. आगामी काळात या निर्णयाचा शालेय शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम दिसून येणार आहे.

