इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये सध्या डाळींचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या या देशासमोर आता अन्नधान्याचे संकट उभे ठाकले आहे. पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्या सरकारसमोर ही मोठी डोकेदुखी ठरत आहे.
पाकिस्तानची अर्थव्यवस्था कमकुवत असल्यामुळे देशाला वारंवार International Monetary Fund कडून कर्ज घ्यावे लागते. अशा परिस्थितीत डाळींच्या उत्पादनात सातत्याने घट होत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे.माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये दरवर्षी सुमारे १६.२ लाख टन डाळ लागते. त्यापैकी सुमारे १०.७ लाख टन डाळ परदेशातून आयात करावी लागते. म्हणजेच बहुतांश गरज आयातीवर भागवावी लागते. यासाठी दरवर्षी जवळपास ९८ कोटी डॉलर खर्च केले जातात.
१९९८ पूर्वी पाकिस्तान डाळ निर्यात करणारा देश होता. मात्र नंतरच्या काळात तत्कालीन राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांच्या कार्यकाळात डाळींच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर शेतकऱ्यांना डाळीचे पीक घेणे परवडेनासे झाले आणि उत्पादन घटत गेले.तज्ज्ञांच्या मते, डाळ ही लोकांच्या पोषणासाठी महत्त्वाची आहेच, पण जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठीही उपयोगी ठरते. मात्र योग्य धोरणे आणि प्रोत्साहन नसल्याने शेतकरी इतर पिकांकडे वळत आहेत.आता या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान सरकार काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

