मुंबई : राज्याचे लाडके नेते अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राचं राजकारण अजूनही सावरत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा एकदा वातावरण तापवलं आहे. या चर्चांदरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या एका गौप्यस्फोटामुळे या प्रक्रेमागचं पडद्यामागचं राजकारण समोर आल्याचं मानलं जात आहे.
वडेट्टीवार यांच्या दाव्यानुसार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्यासाठी गुजरातमधील एका बड्या उद्योगपतीने मध्यस्थी केली होती. काही दिवसांपूर्वी संबंधित उद्योगपती महाराष्ट्रात येऊन गेले असून, समेट घडवून आणण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र हे विलिनीकरण एनडीएला पाठिंबा देण्याच्या अटीवरच होणार होतं आणि याच मुद्द्यावर एकमत न झाल्याने ही प्रक्रिया अडकल्याचं वडेट्टीवार यांनी सूचक शब्दांत सांगितलं.
राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की फेब्रुवारीच्या मध्यात, विशेषतः 12 फेब्रुवारी रोजी, या विलिनीकरणाची अधिकृत घोषणा होणार होती. शरद पवार गटातील नेत्यांनीही या चर्चांना दुजोरा दिला असून, अजित पवार हे स्वतः या एकत्रीकरणासाठी आग्रही होते, असंही सांगितलं जात आहे. काही बैठका खासगी पातळीवर झाल्याचाही दावा पुढे येत आहे.
मात्र दुसरीकडे अजित पवार गटातील अनेक नेत्यांनी या चर्चांबाबत अनभिज्ञता व्यक्त केली आहे. अशा कोणत्याही विलिनीकरणाची माहिती आम्हाला देण्यात आलेली नव्हती, असं सांगत त्यांनी या दाव्यांपासून अंतर राखलं आहे. त्यामुळे नेमकं सत्य काय, याबाबत संभ्रम कायम आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी उद्योगपती गौतम अदानी यांची बारामती भेटही पुन्हा चर्चेत आली आहे. AI सेंटर ऑफ एक्सलन्सच्या उद्घाटनप्रसंगी अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्या वेळी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील प्रमुख नेते उपस्थित होते. या भेटीनंतर दोन्ही राष्ट्रवादी जवळ येत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
राजकीय विश्लेषकांच्या मते, अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे अनेक घडामोडी अर्ध्यावरच थांबल्या. राज्याच्या राजकारणात मोठे बदल घडण्याची शक्यता होती, मात्र आता ते संकेतच उरल्याचं चित्र दिसत आहे. विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे मात्र या संपूर्ण प्रकरणाला नवं राजकीय परिमाण मिळालं आहे.

