India Mornings
India Morning
Global News Portal
Saturday, February 28, 2026
Loading latest news...
News28 February 20263 views

ग्रामीण सत्ताकारणात मोठा फेरबदल; जिल्हा परिषद–पंचायत समित्यांत नामनिर्देशित सदस्यांची एंट्री

P
Puja Nitnaware
Published in General
ग्रामीण सत्ताकारणात मोठा फेरबदल; जिल्हा परिषद–पंचायत समित्यांत नामनिर्देशित सदस्यांची एंट्री

राज्यातील ग्रामीण प्रशासनाच्या रचनेत लक्षणीय बदल घडवणारा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे.

मुंबई: राज्यातील ग्रामीण प्रशासनाच्या रचनेत लक्षणीय बदल घडवणारा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. महानगरपालिकांच्या धर्तीवर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये ठरावीक प्रमाणात नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा परिषदांमध्ये १० टक्के, तर पंचायत समित्यांमध्ये २० टक्के सदस्य नामनिर्देशनाद्वारे घेतले जाणार असून यासंदर्भातील विधेयक लवकरच विधानसभा मंजुरीसाठी मांडले जाण्याची शक्यता आहे.

सरकारच्या मते, ग्रामीण विकास प्रक्रियेत विविध क्षेत्रांतील अनुभवी आणि सक्षम व्यक्तींना थेट सहभाग देणे हा या निर्णयाचा प्रमुख हेतू आहे. सामाजिक कार्य, शिक्षण, क्रीडा, साहित्य, कृषी व सहकार अशा क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थान मिळाल्यास निर्णयप्रक्रिया अधिक व्यापक आणि परिणामकारक होईल, असा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे.

या निर्णयामुळे ग्रामीण राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे. नागपूर जिल्हा परिषदेत सुमारे सहा नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती होऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. पंचायत समित्यांमध्येही २० टक्के जागांवर नियुक्त्या होणार असल्याने इच्छुकांमध्ये राजकीय हालचाली वाढल्या आहेत.

१९९३ मध्ये पंचायत राज कायदा लागू होण्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नामनिर्देशित सदस्यांची तरतूद अस्तित्वात होती. मात्र नंतर ती रद्द करण्यात आली. तब्बल तीन दशकांनंतर ही व्यवस्था पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात मतमतांतरे उमटत आहेत. समर्थकांच्या मते, हा निर्णय ग्रामीण नेतृत्वाला चालना देणारा ठरेल; तर विरोधकांच्या दृष्टीने हे राजकीय समतोल साधण्याचे किंवा पुनर्वसनाचे साधन ठरू शकते.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासंदर्भात लेखी प्रस्ताव सादर केला होता. विधान परिषद आणि महानगरपालिकांप्रमाणेच ग्रामीण स्वराज्य संस्थांमध्येही गुणवंत व्यक्तींना संधी देण्याची आवश्यकता त्यांनी मांडली होती. त्यानंतर ग्रामीण विकास विभागाला सकारात्मक पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, नामनिर्देशित सदस्यांची निवड करताना विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींना संधी देणे कायद्यानुसार अपेक्षित असले तरी यापूर्वी अशा नियुक्त्यांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. राजकीय जवळीक असलेल्या व्यक्तींनाच संधी दिली जाते, अशी टीका वारंवार केली गेली आहे.

आता नव्या तरतुदीनंतर प्रत्यक्षात गुणवत्ताधारित नियुक्त्या होतात की राजकीय समीकरणेच प्राधान्याला येतात, हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र या निर्णयामुळे ग्रामीण सत्ताकारणात निश्चितच नवे राजकीय गणित आकाराला येणार, हे स्पष्ट आहे.

Tags:#Zilla Parishad#Panchayat committees#Mumbai news#Maharashtra news

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
43
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
96
Read More →

झाडावरुन पडला कामगार, पोटाला चिरून निघाली लोखंडी अँगल

तुमसर तालुक्यातील माडगी येथील CBSE शाळेत झाडावरून पडून कामगाराच्या पोटाला लोखंडी अँगल चिरली. प्रकृती गंभीर.

Feb 10, 2026
22
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com