मुंबई - महाराष्ट्रात ऐन थंडीच्या काळात अचानक हवामानाने नवा रंग घेतला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे, सोलापूरमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. मुंबई, पुणे आणि कोकणातील भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि थंड वाऱ्यांचा प्रभाव जाणवत असून, थंडीच्या दिवसांत पावसाचा 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.सोमवारी (12 जानेवारी) पावसाने राज्यातील हवामान चटका लावला असून, मंगळवार (13 जानेवारी) देखील राज्यभर हवामानात सतत बदल होत राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण कायम राहून काही भागांत हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.
मराठवाडा आणि विदर्भात मात्र थंडीचा जोर अधिक असल्याने किमान तापमान 8 ते 14 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येऊ शकते. या भागांमध्ये पहाटे दाट धुके, थंड वारे व हुडहुडी वाढवणारी थंडी जाणवेल. नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, गोंदिया येथे कडाक्याची थंडी राहणार आहे.बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या हवामान प्रणालीमुळे दक्षिण भारतात पावसाची स्थिती तयार झाली असून त्याचा महाराष्ट्रावर अप्रत्यक्ष परिणाम होत आहे. त्यामुळे थंडीच्या काळातही काही भागांमध्ये पावसाची सरी पडत आहेत.
कोकणात सकाळ-रात्र थंडी जाणवेल, पण दुपारी तापमान वाढल्याने उकाडा जाणवण्याची शक्यता आहे. येथे कमाल तापमान 30-32 अंश आणि किमान 18-22 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.हवामान विभागाने नागरिकांना सकाळ आणि रात्री विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. थंडी व पावसामुळे हवामानात बदल होत असल्याने आवश्यक ते कपडे तसेच छत्री सोबत ठेवण्याचा इशारा दिला आहे.
अशा परिस्थितीत स्वेटरसोबत छत्रीही बाळगणे गरजेचे झाले आहे, जेणेकरून थंडी आणि पावसापासून संरक्षण करता येईल. पुढील काही दिवस महाराष्ट्रात अशीच हवामान परिस्थिती राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.नागरिकांनी हवामान विभागाच्या सुचनांकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.

