नवी दिल्ली: राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासदृष्टीकोनावर सविस्तर भाष्य केले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणातून भारताच्या प्रगतीचा ठाम संदेश संसदेत उमटल्याचे त्यांनी नमूद केले.
२१व्या शतकाचा पहिला टप्पा पूर्ण होत असून, पुढील टप्पा ‘विकसित भारत’ साकारण्याच्या दृष्टीने निर्णायक ठरेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. आज भारत केवळ स्वतःची वाटचाल करणारा देश राहिला नसून, जागतिक समस्यांवर उपाय सुचवणारा आणि जगाला आशेची दिशा देणारा देश बनला आहे, असे ते म्हणाले.
भारतीय अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात असून, जीडीपीतील सातत्यपूर्ण वाढ ही देशाच्या बळकटीची साक्ष असल्याचे मोदींनी सांगितले. हीच गती कायम राहिल्यास, भारत लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा यांसह विविध क्षेत्रांत भारत ठोस कामगिरी करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
दरम्यान, जागतिक पातळीवर नवी व्यवस्था आकार घेत असल्याचे सांगत पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या जागतिक रचनेनंतर आता नवा ‘ग्लोबल ऑर्डर’ उदयास येत आहे आणि त्याचा लाभ भारताला होत आहे. आज भारत विश्वासार्ह मित्र आणि व्यापार भागीदार म्हणून ओळखला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
अलीकडच्या काळात भारताने जगातील प्रमुख नऊ देशांशी व्यापार करार केले असून, २७ देशांचा समावेश असलेला व्यापक करार हा ‘मदर ऑफ ऑल डील’ असल्याचेही त्यांनी नमूद केले. याचवेळी विरोधकांवर टीका करत, पूर्वीच्या सरकारांच्या काळात भारतासोबत व्यापार करार करण्यास देश तयार नव्हते, असा आरोप त्यांनी काँग्रेसवर केला.

