छत्रपती संभाजीनगर : बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी सामूहिक कॉपीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर विद्यार्थी एकमेकांच्या उत्तरपत्रिका पाहून लिहित असल्याचे आढळले. विशेष म्हणजे हा प्रकार केंद्रावरील काही शिक्षकांच्या सहकार्याने सुरू असल्याचे ‘सीसीटीव्ही’ तपासणीत स्पष्ट झाले आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मंगळवारपासून बारावीची लेखी परीक्षा सुरू झाली. छत्रपती संभाजीनगर विभागातील पाच जिल्ह्यांतील ४५४ केंद्रांवरून १ लाख ९० हजार ५९२ विद्यार्थी परीक्षा देत आहेत, तर लातूर विभागातील तीन जिल्ह्यांतील २५३ केंद्रांवरून ९६ हजार ४९६ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.
दरम्यान, माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर व विस्तार अधिकारी सिताराम पवार यांच्या भरारी पथकाने संबंधित केंद्राला भेट दिली असता गैरप्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर केंद्रावरील ‘सीसीटीव्ही’ फुटेजची सखोल तपासणी करण्यात आली. तपासात विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या उत्तरपत्रिकांकडे पाहून लिहिल्याचे, एका बाकावर दोन विद्यार्थी बसल्याचे तसेच काही विद्यार्थी उभे राहून उत्तरे लिहित असल्याचे दिसून आले. या सर्व प्रकारात काही शिक्षकांचा सहभाग असल्याचेही स्पष्ट झाले.
या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने केंद्र संचालकांसह एकूण १९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांपैकी पर्यवेक्षक शिक्षक व बैठे पथकातील अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. इतर संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध त्यांच्या संस्थेमार्फत शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन शिक्षण विभागाने तात्काळ संपूर्ण परीक्षा केंद्राचा स्टाफ बदलण्याचा निर्णय घेतला. केंद्र प्रमुखांसह १४ कर्मचारी आणि दोन सहाय्यक अशा १७ जणांची अदलाबदल करण्यात आली असून पुढील सर्व पेपर नियमांनुसार व शिस्तीत पार पडावेत यासाठी नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर केंद्रावर एकूण १४ परीक्षा दालन असून ३३४ विद्यार्थी नोंदणीकृत आहेत. इंग्रजीच्या पेपरला ३२७ विद्यार्थी उपस्थित होते, तर सात विद्यार्थी गैरहजर होते.
“परीक्षा केंद्राला भेट दिल्यानंतर कॉपीचा प्रकार लक्षात आला. ‘सीसीटीव्ही’ फुटेजची सखोल तपासणी केल्यानंतर संपूर्ण प्रकार उघड झाला. तत्काळ कारवाईची प्रक्रिया सुरू केली असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे,” अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी दिली.
जिल्ह्यातील परीक्षा संदर्भातील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई मानली जात असून शिक्षण व्यवस्थेतील शिस्त आणि पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

