वर्धा: वर्धा-नागपूर रेल्वे मार्गावर मंगळवारी सकाळच्या सुमारास धावत्या ‘Grand Express’च्या एका बोगीत अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. तुळजापूर स्थानकाजवळील दहेगाव गोसावी परिसरातील हेलोडी येथे ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, गाडी नियोजित वेळेनुसार पुढे जात असताना एका बोगीतून धूर निघत असल्याचे काही प्रवाशांच्या लक्षात आले. सुरुवातीला किरकोळ बिघाड असल्याचा समज झाला; मात्र काही मिनिटांतच धुराचे प्रमाण वाढून आगीने तीव्र रूप धारण केले. ज्वाळांनी संपूर्ण बोगीला वेढा घातल्याने परिस्थिती गंभीर बनली.
प्रसंगावधान राखत चालकाने तात्काळ गाडी थांबवली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत संबंधित बोगीतील प्रवाशांना बाहेर काढले. तसेच शेजारील डब्यांतील प्रवाशांनाही खबरदारीचा उपाय म्हणून खाली उतरवण्यात आले. अग्निशमन दल आणि रेल्वेच्या आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले; मात्र तोपर्यंत बोगी पूर्णतः जळून खाक झाली होती.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. वेळेवर केलेल्या उपाययोजनांमुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले. प्राथमिक अंदाजानुसार, विद्युत यंत्रणेत बिघाड किंवा शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी. तथापि, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
रेल्वे प्रशासनाने घटनेची सखोल चौकशी सुरू केली असून तज्ज्ञांकडून तपास केला जाणार आहे. या घटनेमुळे काही काळ रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. दरम्यान, घटनेचे व्हिडिओ आणि छायाचित्रे समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून रेल्वे सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

