नागपूर - जागतिक पर्यावरण दिन 2025 निमित्त प्रसिद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय हवेच्या गुणवत्तेवरील (AQI) ताज्या अहवालात जगातील सर्वाधिक प्रदूषित हवेचा सामना करणाऱ्या देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. 2024-2025 या कालावधीतील आकडेवारीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या या अहवालात आफ्रिका आणि दक्षिण आशियातील देशांची स्थिती विशेषतः गंभीर असल्याचे दिसून येते. वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, नैसर्गिक कारणे आणि अपुरी पर्यावरणीय धोरणे यांचा एकत्रित परिणाम म्हणून अनेक देशांतील हवा ‘धोकादायक’ श्रेणीत पोहोचली आहे.
1. चाड – 176 AQI
आफ्रिकेतील हा देश सध्या जगातील सर्वाधिक प्रदूषित हवेचा सामना करत आहे. सहारा वाळवंटातून येणारी धुळीची वादळे आणि सूक्ष्म वाळूकण हे चाडमधील प्रदूषणाचे प्रमुख कारण ठरले आहेत. उद्योगांची संख्या मर्यादित असली तरी नैसर्गिक धुळीमुळे हवेचा दर्जा अत्यंत खालावतो. ग्रामीण भागात लाकूड आणि कोळशाचा इंधन म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने घरगुती प्रदूषणही चिंतेचा विषय बनला आहे.
2. बांगलादेश – 167 AQI
वेगाने होणारे शहरीकरण, विटांच्या भट्ट्या आणि वाहनांची प्रचंड संख्या यामुळे बांगलादेशमध्ये हवेची गुणवत्ता सतत घसरत आहे. राजधानी ढाका आणि आसपासच्या औद्योगिक पट्ट्यांमध्ये बांधकामातून उडणारी धूळ व कारखान्यांचा धूर यामुळे परिस्थिती बिकट होते. हिवाळ्यात स्मॉगची समस्या तीव्र होत असून फुफ्फुसविकारांचे प्रमाण वाढल्याचे आरोग्यतज्ज्ञ सांगतात.
3. पाकिस्तान – 164 AQI
पाकिस्तानातील लाहोर आणि कराची ही शहरे स्मॉगसाठी कुप्रसिद्ध ठरली आहेत. शेतातील पराली जाळणे, वाहनांचा धूर आणि निकृष्ट दर्जाच्या इंधनाचा वापर यामुळे हिवाळ्यात हवा अधिकच विषारी बनते. काही वेळा प्रशासनाला शाळा आणि सार्वजनिक कार्यक्रम बंद ठेवण्याचे आदेश द्यावे लागतात, इतकी परिस्थिती गंभीर होते.
4. Democratic Republic of the काँगो – 153 AQI
काँगोमध्ये खाणकाम हा अर्थव्यवस्थेचा कणा असला तरी त्यातून निघणारी धूळ आणि रसायने हवेत मिसळून प्रदूषण वाढवत आहेत. कोबाल्टसारख्या खनिजांच्या उत्खननामुळे वातावरणीय प्रदूषणात मोठी भर पडते. याशिवाय वीज टंचाईमुळे डिझेल जनरेटर व लाकूड जाळण्याचे प्रमाण वाढले आहे.
5. भारत– 138 AQI
भारताचा पाचवा क्रमांक लागणे ही चिंतेची बाब आहे. वाढती लोकसंख्या, औद्योगिक उत्सर्जन, जुनी वाहने आणि उत्तर भारतातील पराली जाळण्याची प्रथा यामुळे हवेची गुणवत्ता घसरत आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता यांसारख्या महानगरांमध्ये PM 2.5 कणांचे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांपेक्षा अनेक पटीने जास्त आढळले आहे. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून श्वसनविकार, दमा आणि हृदयरोगांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
चिंतेची घंटा-
हा अहवाल केवळ क्रमवारीपुरता मर्यादित नसून, जागतिक स्तरावर पर्यावरणीय धोरणे अधिक कठोर करण्याची गरज अधोरेखित करतो. हवामान बदल, औद्योगिक वाढ आणि शहरीकरण यामधील संतुलन राखण्यासाठी प्रत्येक देशाने ठोस पावले उचलणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
प्रदूषणाचा प्रश्न आता केवळ पर्यावरणाचा नाही, तर सार्वजनिक आरोग्य आणि भविष्यातील पिढ्यांच्या अस्तित्वाचा झाला आहे.

