अकोला : जिल्ह्यातील तेल्हारा शहरात रविवारी दुपारी काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. बाजार रोड परिसरात भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रकने तीन शाळकरी मुलांना जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, तिघेही विद्यार्थी मोटारसायकलवरून जात असताना वाहन अचानक बंद पडले. त्यामुळे त्यांनी मोटारसायकल रस्त्याच्या कडेला उभी केली आणि ते बाजूला थांबले. त्याच वेळी मागून वेगात येणाऱ्या ट्रकने नियंत्रण गमावले आणि तिघांनाही चिरडले. अपघात इतका भीषण होता की तिघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला.
माहिती मिळताच तेल्हारा पोलीस ठाणे येथील पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांकडून अपघाताचा सखोल तपास सुरू आहे.या अपघातात मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांची नावे साई रामेश्वर वैष्णव (१३), दर्शन रामेश्वर वैष्णव (१६) आणि गणेश दीपक आप्तुरकर (१७) अशी आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे तेल्हारा परिसरात हळहळ व्यक्त होत असून दोषींवर कडक कारवाईची मागणी होत आहे.

