मुंबई : महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर कडाडून टीका करत राज्यभर मोठी जनआंदोलन उभारण्याची घोषणा केली. महिलांना एकत्र आणत १ कोटी सह्या गोळा करण्याची मोहीम राबवण्यात येणार असून, यामधून जनजागृती केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांनी उद्धवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसवर महिला विरोधी भूमिका घेतल्याचा आरोप केला. “लोकशाहीत जनतेचा दबाव निर्माण झाला, की विरोधकांना महिला आरक्षणाला पाठिंबा द्यावाच लागेल,” असे ते म्हणाले. महिलांना आरक्षण मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला संसदेत पाठिंबा न मिळाल्याबद्दल त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “सरकारने बदल सुचवले तरी विरोधकांनी साथ दिली नाही. उलट त्यांनी दिशाभूल करणारे आरोप केले,” अशी टीका त्यांनी केली.
भाजपने विविध राज्यांत महिलांना नेतृत्वाची संधी दिल्याचे उदाहरण देत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. “महिलांना संधी न देण्याची परंपरा विरोधकांचीच आहे,” असे ते म्हणाले.
प्रियंका गांधी यांच्याविषयी बोलताना त्यांनी सौम्य भूमिका घेतली. “त्या नव्या आहेत, त्यामुळे काही बाबी त्यांना स्पष्ट झाल्या नसतील,” असे त्यांनी नमूद केले. महिला आरक्षण २०२९ पर्यंत लागू होईल आणि महिलाच योग्य निर्णय घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ओबीसी जनगणनेच्या मुद्द्यावर त्यांनी काँग्रेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “मोदी सरकारने जात जनगणना मान्य केली आहे, मात्र यापूर्वी या विषयाकडे दुर्लक्ष करण्यात आले,” असे ते म्हणाले.
दरम्यान, राहुल गांधी यांच्यावर टीका करताना फडणवीस म्हणाले, “गैरसमज पसरवणे हा त्यांचा स्वभाव झाला आहे.” तसेच महात्मा फुले यांच्या विचारांचा उल्लेख करत विरोधक त्यांच्या तत्वांपासून दूर गेल्याचा आरोपही त्यांनी केला.

