नागपूर : देशातील आर्थिक घडामोडींमध्ये मोठी उलथापालथ होत असताना भारतीय रुपयाच्या मूल्यात ऐतिहासिक घसरण झाली आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया तब्बल 94 रुपयांच्या निचांकी पातळीवर घसरल्याने अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
आखाती देशांतील तणावपूर्ण परिस्थिती, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून सातत्याने होत असलेली भांडवलाची माघार यामुळे रुपयावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. परिणामी, रुपयाची वाटचाल आता शंभरीकडे सुरू असल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. दिल्लीत माध्यमांशी बोलताना त्यांनी “अबकी बार, रुपया 100 के पार!” असा टोला लगावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले.
राऊत म्हणाले, “रुपया सतत घसरत असताना देशाचे पंतप्रधान पश्चिम बंगालमध्ये राजकीय डावपेचांमध्ये व्यस्त आहेत. ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. मात्र, देशाच्या अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष होत आहे.”
यावेळी त्यांनी पंतप्रधानांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून देत सवाल उपस्थित केला. “पूर्वी मोदी म्हणायचे, रुपयाचे मूल्य घसरले की देशाची प्रतिष्ठा घसरते. मग आता नक्की काय घसरत आहे?” असा बोचरा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पश्चिम बंगालमधील राजकीय परिस्थितीवरही भाष्य करताना राऊत यांनी भाजपवर टीका केली. “सत्ता, पैसा आणि यंत्रणांचा वापर करून ‘खेला’ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळेच तिथे अघोषित आणीबाणीचे वातावरण निर्माण झाले आहे,” असे ते म्हणाले.
दरम्यान, संजय राऊत यांच्या तुरुंगातील अनुभवांवर आधारित ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती ‘Unlikely Paradise’ 23 मार्च रोजी प्रकाशित होणार आहे. या पुस्तकात काही नवीन प्रकरणांचा समावेश करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

