मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, या निर्णयामागे अशोक खरात प्रकरणामुळे निर्माण झालेल्या वादाची पार्श्वभूमी असल्याची चर्चा रंगली आहे.
काही दिवसांपूर्वी अशोक खरात याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर सोशल मीडियावर त्याचे आणि रुपाली चाकणकर यांचे काही फोटो व व्हिडिओ व्हायरल झाले. महिलांशी संबंधित गंभीर आरोपांमध्ये नाव असलेल्या व्यक्तीसोबत चाकणकर यांचे संबंध दिसत असल्याने जनतेत तीव्र नाराजी व्यक्त झाली.
या प्रकरणामुळे चाकणकर यांच्या पदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. महिला आयोगाच्या प्रमुख पदावर असलेल्या व्यक्तीने अशा वादग्रस्त व्यक्तीशी जवळीक दाखवणे योग्य नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. प्रकरणाला राजकीय रंग चढला आणि विविध स्तरांवरून दबाव वाढू लागला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घडामोडींवर नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली असून, त्यांनी राजीनामा देण्यास सांगितल्याची चर्चा आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील काही नेत्यांनीही चाकणकर यांना पाठिंबा दर्शवला नाही.
या सर्व दबावाच्या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. राजीनामा पत्रात त्यांनी वैयक्तिक कारणांचा उल्लेख करत सर्वांचे आभार मानले आहेत.
मात्र, त्यांनी वैयक्तिक कारणे दिली असली तरी खरात प्रकरणामुळेच हा निर्णय घ्यावा लागल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

