पुणे:मुंबई द्रुतगती महामार्गावरील वाहतूक अखेर तब्बल ३२ तासांच्या खंडानंतर पुन्हा सुरू झाली आहे. आडोशी बोगद्याजवळ अपघातग्रस्त झालेला गॅस वाहतूक करणारा कॅप्सूल टँकर क्रेनच्या मदतीने हटवण्यात आल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
रात्री १.४० वाजता पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहनांना सोडण्यात आले. सध्या दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू असली, तरी मोठ्या प्रमाणात वाहने अडकल्याने रांगा कमी होण्यासाठी वेळ लागत आहे. दीर्घकाळ कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना अखेर दिलासा मिळाला असला, तरी त्यांच्या मनातील नाराजी कायम आहे.
मंगळवारी सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास आडोशी बोगद्याजवळ ज्वालाग्रही गॅसने भरलेला टँकर पलटी झाला होता. अपघातानंतर टँकरमधून प्रोफोलिन गॅसची गळती सुरू झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव दोन्ही बाजूंची वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली. गॅस लिकेज नियंत्रणात आणल्यानंतर काही काळासाठी मर्यादित वाहतूक सुरू करण्यात आली; मात्र धोका लक्षात घेता ती पुन्हा थांबवावी लागली.
त्यानंतर अपघातग्रस्त टँकरमधील गॅस अन्य टँकरमध्ये स्थानांतरित करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. टँकरमध्ये अल्प प्रमाणात गॅस शिल्लक राहिल्यानंतर चार क्रेनच्या सहाय्याने टँकर पूर्णपणे बाजूला करण्यात आला आणि महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.
या घटनेमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. अनेक वाहनचालक १५ ते २० तास वाहतूक कोंडीत अडकले होते. टोल भरूनही इतक्या मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. काही प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करत जीव मुठीत धरून प्रवास केला.
या कोंडीत लहान मुले, वृद्ध आणि गंभीर आजाराचे रुग्ण अडकले होते. वेळेत वैद्यकीय मदत न मिळाल्याने अनेकांचे हाल झाले. त्यामुळे एका टँकरच्या अपघातामुळे संपूर्ण द्रुतगती मार्ग तब्बल ३२ तास बंद ठेवण्याची वेळ का आली, प्रशासनाने वेळीच प्रभावी उपाययोजना का केल्या नाहीत, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणी जबाबदारांवर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

