नागपूर : डिजिटल माध्यमातील पत्रकार विजय खवसे आणि मुकेश मोहन यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, या मागणीसाठी मिशन बहुजन संघटनेच्या नेतृत्वाखाली संविधान चौकात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात बहुजन समाज पार्टी, भीम आर्मी, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच विविध सामाजिक संघटनांनी सहभाग नोंदवला. आंदोलकांनी दोन्ही पत्रकारांवर लावण्यात आलेल्या गुन्ह्यांचा निषेध करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
आंदोलनकर्त्यांच्या मते, विजय खवसे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान शहरात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांबाबत पोलीस आयुक्तांकडे प्रश्न उपस्थित केला होता. पत्रकार म्हणून समाजातील वास्तव समोर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. खवसे यांना २५ वर्षांहून अधिक पत्रकारितेचा अनुभव असून त्यांच्या लेखनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
तसेच मुकेश मोहन यांच्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ५० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. मोहन हे डिजिटल माध्यमातील ओळखले जाणारे पत्रकार असून तेही समाजातील मुद्दे मांडण्याचे काम करत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. सत्य मांडणे हा गुन्हा आहे का, असा सवाल उपस्थित करत डिजिटल माध्यमातील पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
या वेळी मिशन बहुजन संघटनेचे अध्यक्ष राकेश धारगावे, उपाध्यक्ष निहाल पाटील, सचिव धीरज गणेर, बसपाचे प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, वंचित बहुजन आघाडीचे नेते राजेश जंगले, भीम आर्मीचे अंकित राऊत, आरपीआयचे यशवंत तेलंग यांच्यासह अनेक पत्रकार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलकांनी खवसे आणि मोहन यांच्यावरील कारवाई तातडीने मागे घेण्याची मागणी केली.

