नालंदा (बिहार): बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील शीतला माता मंदिरात मंगळवारी झालेल्या धार्मिक कार्यक्रमादरम्यान भीषण चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 8 महिलांचा मृत्यू झाला असून अनेक भाविक जखमी झाले आहेत. जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.
गर्दी अनियंत्रित झाल्याने दुर्घटना
चैत्र महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी दर्शनासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. मात्र, इतक्या मोठ्या संख्येतील गर्दीसाठी आवश्यक ती सुरक्षा आणि व्यवस्थापन नसल्याचे दिसून आले. दर्शनासाठी रांगा लागलेल्या असताना काही भाविकांनी घाईगडबडीत रांग तोडल्याने गोंधळ उडाला. यानंतर एकच धावपळ सुरू झाली आणि चेंगराचेंगरी झाली.
घटनास्थळी पोलिसांचा उशिरा हस्तक्षेप?
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. डझनहून अधिक जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यापैकी 8 महिलांना मृत घोषित केले.
व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिर परिसरात पुरेसा पोलीस बंदोबस्त नव्हता. गर्दी नियंत्रणासाठी कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याने परिस्थिती हाताबाहेर गेल्याचा आरोप केला जात आहे. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडल्याची टीका होत आहे.
राष्ट्रपतींच्या कार्यक्रमामुळे लक्ष विचलित?
दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नालंदा येथे एका कार्यक्रमासाठी उपस्थित असल्याची माहिती आहे. नालंदा विद्यापीठातील दीक्षांत समारंभामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तेथे तैनात असल्याने मंदिर परिसरातील बंदोबस्त कमी पडल्याची चर्चा आहे.
मृतांचा आकडा वाढण्याची भीती
सध्या जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

