मेघालय: मेघालयातील ताशखाई परिसरात असलेल्या कोळसा खाणीत भीषण स्फोटाची दुर्घटना घडली असून किमान दहा कामगारांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या स्फोटानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून अनेक कामगार अद्याप खाणीत अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, मेघालय पोलीस आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर शोध व बचाव मोहीम सुरू आहे. स्फोट इतका तीव्र होता की खाणीतील काही भाग कोसळल्याचेही सांगण्यात येत आहे, त्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, स्फोटामुळे खाणीत काम करणारे अनेक कामगार आत अडकले. मृतांपैकी सर्व कामगार आसामचे असल्याचा प्राथमिक अंदाज असून, याबाबत अधिकृत पुष्टी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, मृतांपैकी एक कामगार आसाममधील कटिगरा भागातील बिहारा गावाचा रहिवासी होता.
बचावकार्य सुरळीत पार पडावे यासाठी प्रशासनाने घटनास्थळाच्या आसपासचा परिसर सील केला असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. स्फोटाचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात खाणीत गॅस गळती किंवा तांत्रिक बिघाडामुळे स्फोट झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या दुर्घटनेनंतर कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, बेकायदेशीर खाणकामाबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच मृत कामगारांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत दिली जाईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

