नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप करत लिलावती रुग्णालयातील कथित गैरप्रकारांची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडली.
देशमुख म्हणाले की, गृहमंत्रीपदावर असताना आपल्यावर खोटे आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. आता लिलावती रुग्णालयातील घडामोडींमुळे परमबीर सिंग यांच्या कथित कृत्यांचा पर्दाफाश होत असल्याचा दावा त्यांनी केला. रुग्णालय प्रशासनाने त्यांना पदावरून दूर केल्याने अनेक बाबी समोर आल्याचेही ते म्हणाले.
रुग्णालयातील काही ट्रस्टी आणि डॉक्टरांनी परमबीर सिंग यांच्यावर बढतीसाठी प्रत्येकी सुमारे २५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केल्याचे देशमुख यांनी सांगितले. या तक्रारींमुळे आणि कथित गैरवर्तनामुळे त्यांना पदावरून हटविण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
देशमुख यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाबाहेर स्फोटक साहित्य आढळल्याच्या प्रकरणाचाही उल्लेख केला. त्या वेळी तपासाबाबत दिशाभूल झाल्याचा आरोप करत तपास दहशतवादविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित तपासात काही गंभीर बाबी समोर आल्याचेही त्यांनी नमूद केले.
१०० कोटी रुपयांच्या कथित वसुलीच्या आरोपांचा उल्लेख करत देशमुख म्हणाले की, या प्रकरणी त्यांनी स्वतः चौकशीची मागणी केली होती. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती; मात्र वारंवार समन्स देऊनही परमबीर सिंग हजर राहिले नाहीत, असा आरोप त्यांनी केला.
लिलावती रुग्णालयातील कथित प्रकरणामुळे त्यांच्या वर्तनाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचा दावा करत देशमुख यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

