पुणे: पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीवर उबाठा शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत एकहाती सत्ता मिळवली आहे. एकूण १६ सदस्यांच्या पंचायत समितीत उबाठा शिवसेनेने तब्बल १२ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केलं आहे.
या निवडणुकीत तालुक्याबरोबरच जिल्हास्तरावरही पक्षाची ताकद वाढल्याचं चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उबाठा शिवसेनेने ५ जागांवर यश संपादन केलं असून, यामुळे पक्षाचा प्रभाव आणखी मजबूत झाला आहे.मात्र, या विजयाच्या पार्श्वभूमीवर आमदार बाबाजी काळेंना संमिश्र यशाचा सामना करावा लागला आहे. पक्षाला सत्ता मिळाली असली, तरी त्यांच्या बहिणीचा निवडणुकीत पराभव झाल्याने खेडच्या राजकारणात “गड आला, पण सिंह गेला” अशी चर्चा रंगू लागली आहे.
विशेष म्हणजे, या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत राज्यातील इतर पक्षांचे प्रमुख नेते प्रचारसभांसाठी मैदानात उतरले होते. मात्र, उबाठा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे किंवा पक्षातील कोणत्याही दिग्गज नेत्याने खेडमध्ये एकही सभा घेतली नाही. तरीही, स्थानिक नेतृत्व आणि संघटनशक्तीच्या जोरावर उबाठा शिवसेनेने मोठा विजय मिळवत पंचायत समितीवर आपली ‘मशाल’ ठामपणे पेटवली आहे.हा निकाल येत्या काळात खेड तालुक्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

