राज्यात उन्हाची तीव्रता वाढत असताना शरीराला थंडावा देण्यासाठी अनेकजण विविध पर्यायांचा अवलंब करत आहेत. मात्र पारंपरिक पद्धतीने मातीच्या माठात साठवलेले पाणी आजही तितकेच उपयुक्त ठरत आहे. नैसर्गिकरीत्या थंड राहणारे हे पाणी शरीराला आराम देण्याबरोबरच आरोग्यालाही लाभदायक ठरते. त्यामुळे या दिवसांत कृत्रिम थंड पाण्याऐवजी माठातील पाणी पिणे अधिक हितावह मानले जात आहे.
माठातील पाण्याचे आरोग्यदायी फायदे-
पचनक्रिया सुधारण्यास मदत-
माठातील पाणी शरीराला सहज पचते. त्यामुळे अन्न पचण्यास मदत होते आणि ॲसिडिटी, गॅस किंवा पोटफुगी यांसारख्या समस्या कमी होण्यास सहाय्य होते.
शरीर शुद्ध ठेवण्यास सहाय्यक-
मातीच्या भांड्यातील पाणी शरीरातील घातक घटक बाहेर टाकण्यास मदत करते. त्यामुळे त्वचेवरही सकारात्मक परिणाम दिसून येतो आणि शरीर ताजेतवाने राहते.
घशाचे संरक्षण आणि प्रतिकारशक्ती वाढ-
अतिथंड पाण्यामुळे घशावर ताण येऊ शकतो. परंतु माठातील पाणी संतुलित थंड असल्याने घशाला त्रास होत नाही. यामुळे सर्दी-खोकल्याचा धोका कमी होतो आणि शरीराची रोगप्रतिकारक क्षमता सुधारते.
-माठ वापरताना घ्यावयाची काळजी
-माठ नियमितपणे स्वच्छ ठेवणे आवश्यक
-दीर्घकाळ साठवलेले पाणी वापरणे टाळावे
-पाणी नेहमी झाकून ठेवावे
-माठ थेट उन्हात न ठेवता सावलीत ठेवावा
उन्हाळ्यात साध्या आणि नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करून आरोग्य सांभाळण्यासाठी माठातील पाणी हा एक प्रभावी आणि सहज उपलब्ध पर्याय ठरतो.

