अहमदाबाद : प्रेमविवाहाच्या नोंदणी प्रक्रियेत मोठे बदल करण्याचा प्रस्ताव गुजरात सरकारने पुढे आणला असून, अर्ज दाखल होताच मुलीच्या पालकांना व्हाट्सअँपद्वारे तात्काळ सूचना पाठवण्याची तरतूद करण्यात आली आहे. 2006 च्या विवाह नोंदणी कायद्यात सुधारणा करण्यासाठी हा प्रस्ताव गुजरात विधानसभेत मांडण्यात आला आहे. नियम 44 मध्ये बदल सुचवण्यात आले असून, त्यावर नागरिकांकडून 30 दिवसांत हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत.
या संदर्भात गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, मुलींचे संरक्षण आणि विवाह प्रक्रियेत पारदर्शकता वाढवणे हा या बदलांचा मुख्य उद्देश आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे किंवा पालकांना अंधारात ठेवून होणाऱ्या विवाहांना आळा बसावा, यासाठी नियम अधिक कठोर करण्यात येत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
नव्या तरतुदीनुसार विवाह नोंदणीसाठी अर्ज करताना संबंधित जोडप्याने पालकांना विवाहाबाबत माहिती दिल्याचे स्व-घोषणापत्र सादर करणे आवश्यक असेल. तसेच वधू-वरांच्या कागदपत्रांसह त्यांच्या पालकांचे ओळखपत्र आणि संपर्क तपशील देणेही बंधनकारक राहणार आहे. अर्ज सादर झाल्यानंतर सर्व कागदपत्रांची सखोल पडताळणी केली जाईल आणि ठरावीक कालावधीनंतर विवाह प्रमाणपत्र जारी केले जाईल.
प्रशासकीय पातळीवरही बदल सुचवण्यात आले आहेत. आतापर्यंत विवाह नोंदणीची प्रक्रिया प्रामुख्याने तलाठ्यांकडे होती; मात्र पुढे अर्ज स्वीकृती आणि प्राथमिक तपासणीपुरती त्यांची भूमिका राहील. अंतिम मान्यता देण्याचा अधिकार तालुका स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे असेल. तसेच नोटरीकरणाच्या प्रक्रियेतही कडक अटी घालण्यात आल्या असून, पक्षकारांच्या प्रत्यक्ष उपस्थितीतच स्वाक्षरी आणि शिक्का मारणे आवश्यक राहणार आहे.या सर्व बदलांमुळे प्रेमविवाह नोंदणीची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि नियंत्रित होणार असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे; तर दुसरीकडे या प्रस्तावावर नागरिकांकडून येणाऱ्या प्रतिक्रिया काय असतील, याकडेही लक्ष लागले आहे.

