मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा फटका भारतातील ऊर्जा पुरवठ्यावर बसू लागला आहे. नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाच्या कमतरतेमुळे एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यावर ताण निर्माण झाला असून, नागरिकांना वेळेवर गॅस मिळण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने पीएनजी (पाईपद्वारे नैसर्गिक वायू) वापरण्याचा पर्याय स्वीकारण्याचे आवाहन केले आहे.
अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, ज्या भागांमध्ये पीएनजी सुविधा उपलब्ध आहे, त्या ठिकाणी नागरिकांनी तीन महिन्यांच्या आत कनेक्शनसाठी अर्ज करणे गरजेचे आहे. हा नियम घरगुती तसेच व्यावसायिक ग्राहकांसाठी लागू राहणार आहे.
सरकारने स्पष्ट केले आहे की, ज्या परिसरात पीएनजी उपलब्ध असूनही नागरिकांनी त्यासाठी अर्ज केला नाही, तर त्यांच्या एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. मात्र, ज्यांनी आधीच पीएनजीसाठी अर्ज केला आहे आणि कनेक्शन मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत, त्यांना एलपीजीचा पुरवठा सुरूच राहील.
दरम्यान, अर्ज प्रक्रियेबाबत माहिती हवी असल्यास नागरिकांनी संबंधित जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे. ज्या भागांमध्ये पीएनजी सुविधा सुरू आहे किंवा सुरू होण्याच्या प्रक्रियेत आहे, त्याठिकाणीच हा नियम लागू राहणार आहे.

