नवी दिल्ली : इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेत बोलताना परराष्ट्र मंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर यांनी महत्त्वाची माहिती दिली. २८ फेब्रुवारीपासून या संघर्षाची परिस्थिती तीव्र झाली असून या घटनांमध्ये दोन भारतीयांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण जखमी झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, आखातातील देशांमध्ये सुमारे एक कोटी भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत आणि त्यांच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकार अत्यंत सतर्क आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम आशियातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्याचे भारताने आवाहन केले आहे.
परराष्ट्र मंत्र्यांनी पुढे सांगितले की, सध्या तीन इराणी जहाजे हिंद महासागरात आहेत. इराणच्या विनंतीवरून त्यापैकी एका जहाजाला भारताने आश्रय दिला आहे. तसेच त्या भागातील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी दूतावास सतत संपर्कात असून आवश्यक ती मदत पुरवली जात आहे.
दरम्यान, राज्यसभेत या विषयावर विरोधी पक्षाकडून चर्चा करण्याची मागणी करण्यात आली. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीमुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेसमोर उभ्या राहणाऱ्या आव्हानांवर सविस्तर चर्चा व्हावी, अशी मागणी केली.
मात्र, परराष्ट्र मंत्र्यांच्या विधानादरम्यान विरोधी पक्षातील सदस्यांनी सभागृहातून बहिर्गमन केले. यावर केंद्रीय मंत्री जगतरप्रकाश नड्डा यांनी नाराजी व्यक्त करत विरोधी पक्षाचे वर्तन अत्यंत बेजबाबदार असल्याची टीका केली. मुद्द्यांवर चर्चा सुरू असताना विरोधक सभागृह सोडून जातात, असा आरोपही त्यांनी केला.

