पुणे : राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात मोठी न्यायालयीन हालचाल झाली आहे. सत्र न्यायालयाने या प्रकरणातील सहाही आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले असून 23 फेब्रुवारीपासून नियमित सुनावणीला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे या खटल्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
16 मे रोजी भुकूम येथील सासरी घरात वैष्णवीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. शवविच्छेदन अहवालात शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळल्याने मृत्यूबाबत संशय निर्माण झाला. आत्महत्या की घातपात, याबाबत विविध प्रश्न उपस्थित झाले होते. या घटनेनंतर राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला.
17 मे रोजी वैष्णवीच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. तपासादरम्यान पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, दीर सुशील हगवणे आणि निलेश चव्हाण या कुटुंबीय मित्राला अटक करण्यात आली. जुलै महिन्यात पोलिसांनी आरोपपत्र न्यायालयात सादर केले.
आरोपींवर हुंडाबळी, आत्महत्येस प्रवृत्त करणे, शारीरिक व मानसिक छळ, गुन्ह्याचा कट रचणे आणि पुरावे लपवण्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. निलेश चव्हाण याच्यावर अल्पवयीन मुलाला बेकायदेशीर ताब्यात ठेवणे व कुटुंबीयांना धमकावल्याचा स्वतंत्र आरोप आहे. तो नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना अटकेत घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
वैष्णवी आणि शशांक यांचा 28 एप्रिल 2023 रोजी प्रेमविवाह झाला होता. विवाहानंतर हुंड्याच्या मागणीवरून छळ सुरू असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. यापूर्वीही तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली होती.
आता न्यायालयात आरोप निश्चित झाल्याने खटल्याची औपचारिक सुनावणी सुरू होणार असून दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि सादर होणाऱ्या पुराव्यांवरून अंतिम निर्णय दिला जाणार आहे. वैष्णवीला न्याय मिळावा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

