बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात महिलांच्या आणि तरुणींच्या बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनांनी गंभीर प्रश्न निर्माण केला आहे. अवघ्या २४ तासांच्या कालावधीत सहा मुली, एका विवाहित महिलेसह एका तरुणाच्या बेपत्ता होण्याची नोंद झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
काही दिवसांपूर्वीही जिल्ह्यात एका दिवसात सहा महिलांच्या बेपत्ता होण्याची घटना समोर आली होती. त्यानंतर पोलीस विभागाने घाईघाईत एक प्रेस नोट प्रसिद्ध केली. मात्र या पत्रकात प्रकरणांची सविस्तर माहिती देण्यात आलेली नसल्याने उलट संभ्रम अधिक वाढल्याची चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात बुलढाणा जिल्ह्यातून सुमारे दीड हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता झाल्याची नोंद आहे. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी एक हजारांहून अधिक महिला असल्याचे सांगितले जाते. तरीही यासंदर्भात पोलिसांकडून स्पष्ट व अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. शिवाय प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेस नोटवर कोणत्याही अधिकाऱ्याची सही नसल्याने तिच्या विश्वसनीयतेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
जिल्ह्यात दररोज सरासरी पाच ते सहा मुली किंवा विवाहित महिला बेपत्ता होत असल्याची माहितीही समोर येत आहे. बुधवारी नोंदवलेल्या प्रकरणांमध्ये एका विवाहितेसह पाच मुली आणि एक युवक असे एकूण सहा जण अचानक गायब झाल्याची नोंद आहे. या वाढत्या घटनांमुळे जिल्ह्यात नेमकं काय घडत आहे, असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत.
जानेवारीच्या सुरुवातीपासून ते १० मार्चपर्यंत जिल्ह्यात तब्बल २८९ व्यक्ती बेपत्ता झाल्याची नोंद आहे. यामध्ये २०० हून अधिक महिलांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. महिलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे पालक आणि कुटुंबीयांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, बेपत्ता झालेल्या मुली किंवा महिलांचे पुढे काय होते याबाबत ठोस माहिती समोर येत नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर वाटू लागली आहे.
दरम्यान, जिल्हा पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार २०२५ मध्ये हरविलेल्या महिलांपैकी सुमारे ८७ टक्के महिलांचा शोध लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात “महिला मिसिंग डेस्क” सुरू करण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये “मिसिंग सेल” कार्यरत असल्याचे सांगण्यात आले आहे.
मात्र दुसरीकडे २०२१ पासून आतापर्यंत महिला बेपत्ता प्रकरणांपैकी तब्बल २८४ प्रकरणे अद्यापही प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या या बेपत्ता घटनांमागे नेमकं काय कारण आहे, हा प्रश्न अधिकच गडद होत चालला आहे.

