बारामती : येथे घडलेल्या विमान दुर्घटनेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मृत्यू झाल्यानंतर या संपूर्ण घटनेभोवती अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ही घटना साधा अपघात होता की यामागे घातपाताचा डाव होता, यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असून मंत्रालयात आत्मदहन करण्याचा इशाराही दिला आहे.
बारामती विमानतळावर २८ जानेवारी रोजी झालेल्या या दुर्घटनेत अजितदादा पवार यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अनेक राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनी या प्रकरणाकडे संशयाच्या नजरेने पाहण्यास सुरुवात केली आहे. आमदार रोहित पवार यांनी वारंवार पत्रकार परिषद घेत या घटनेमागे घातपाताची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगितले आहे. त्यांनी वैमानिकाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित करत विमान व्यवस्थापनाशी संबंधित एका खासगी संस्थेवर आणि तिच्या मालकावरही गंभीर आरोप केले आहेत.
या प्रकरणाच्या तपासाबाबतही रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विमान दुर्घटना तपास यंत्रणा आणि राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांच्या चौकशीवर त्यांनी प्रश्न उपस्थित करत संपूर्ण प्रकरणाची सखोल व पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. यासाठी त्यांनी देशातील काही महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतल्याची माहितीही पुढे आली आहे.
दरम्यान, तपासाच्या गतीबाबत नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही पदाधिकारी धाराशिव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व मोहन मुंडे करत असून त्यांनी प्रशासनासमोर काही ठोस मागण्या मांडल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, दुर्घटनेपूर्वी अजितदादा पवार विमानतळावर पोहोचल्याचे चित्रफिती सार्वजनिक करण्यात याव्यात आणि या प्रकरणातील दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा.
मोहन मुंडे यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, जर त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत तर येत्या १ मे रोजी मुंबई येथील मंत्रालयात आत्मदहन करण्याचा टोकाचा निर्णय घेतला जाईल. या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पक्षातील काही आमदार व कार्यकर्त्यांमध्ये तपासाबाबत नाराजी असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

