बदलापूर : मानवी तस्करीच्या घटना देशभरात अधूनमधून समोर येत असतानाच आता बदलापूर परिसरात उघड झालेल्या अंडाशय तस्करीच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. गोरगरीब आणि आर्थिक अडचणीत सापडलेल्या महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या शरीराशी खेळ करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या तपासातून पुढे आला आहे.
गोरगरीब महिलांना आमिष, शरीराशी अमानुष खेळ
बदलापूरमधील काही महिलांना मोठ्या रकमेचे प्रलोभन देत त्यांना इंजेक्शन्स देण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. या इंजेक्शन्समुळे गर्भाशयातील स्त्रीबीजांची वाढ वेगाने होण्यासाठी प्रक्रिया राबवली जात असल्याचा संशय आहे. त्यानंतर संबंधित महिलांना आयव्हीएफ सेंटरमध्ये नेऊन शस्त्रक्रियेच्या माध्यमातून अंडाशय काढले जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
पीडितेच्या धाडसामुळे रॅकेटचा पर्दाफाश
या प्रकरणाचा उलगडा एका पीडित महिलेच्या धाडसामुळे झाला. तिने बदलापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधत संशय व्यक्त केला. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तत्काळ बदलापूर पूर्व आणि पश्चिम पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेताच धक्कादायक बाबी उघड होऊ लागल्या.
तीन महिलांना अटक; पोलीस कोठडी
या प्रकरणात ज्युवेली गावात राहणारी सुलक्षणा गाडेकर, उल्हासनगर येथील अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखेडे या तिघींना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना २५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सध्या सुरू आहे.
घरातून संशयास्पद साहित्य जप्त
पोलिसांनी गाडेकरच्या ज्युवेली येथील नॅनो सिटी परिसरातील घरावर छापा टाकून मोठ्या प्रमाणात संशयास्पद इंजेक्शन्स, सोनोग्राफीचे फोटो, महिलांची छायाचित्रे, खोटी प्रतिज्ञापत्रे आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. प्राथमिक चौकशीत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बेकायदेशीररीत्या सोनोग्राफी करून घेतली जात असल्याचेही उघड झाले आहे.
आयव्हीएफ सेंटरचा गैरवापर?
तपासादरम्यान काही आयव्हीएफ केंद्रांच्या भूमिकेबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. महिलांच्या शरीरातून काढण्यात आलेल्या अंडाशयांची विक्री केली जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या व्यवहारातून मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
किती महिला बळी? तपास सुरू
या रॅकेटमुळे आतापर्यंत किती महिलांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. पीडित महिलांना पुढे येऊन तक्रार नोंदवण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.मानवी संवेदनांना काळीमा फासणाऱ्या या प्रकारामुळे बदलापूरसह परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पैशांच्या हव्यासापोटी महिलांच्या आरोग्याशी आणि आयुष्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

