केरळ: देशातील महत्त्वाच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज आसाम, केरळ आणि केंद्रशासित प्रदेश पुदुचेरी येथे एकाच टप्प्यात मतदान पार पडत आहे. या तीनही राज्यांतील एकूण २९६ जागांसाठी मतदार आपला हक्क बजावत आहेत. यामध्ये केरळमधील १४०, आसाममधील १२६ आणि पुदुचेरीतील ३० जागांचा समावेश आहे.
या निवडणुका केवळ सत्तांतरासाठी नसून, प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व आणि राष्ट्रीय पक्षांची विश्वासार्हता यांची कसोटी मानल्या जात आहेत. विशेषतः आसाम आणि केरळमधील निकालांचा राष्ट्रीय राजकारणावरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आसाममध्ये मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली एनडीए तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील आहे. विकास आणि प्रादेशिक अस्मिता या मुद्द्यांवर भाजपने भर दिला आहे. याउलट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई यांच्या नेतृत्वाखाली सहा पक्षांची आघाडी सत्तांतरासाठी प्रयत्न करत आहे. अखिल गोगोई यांच्यासह प्रादेशिक पक्षांचाही या आघाडीत समावेश आहे. विशेष म्हणजे, मोठ्या संख्येतील तरुण मतदार या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
केरळमध्ये मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांच्या नेतृत्वाखालील डावी लोकशाही आघाडी (LDF) पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यातील लढत पारंपरिकरीत्या डाव्या आणि काँग्रेस-आघाडीमध्ये रंगतदार होत असून, यंदाही तीच चुरस पाहायला मिळत आहे.
दरम्यान, पुदुचेरीमध्ये मुख्यमंत्री एन. रंगस्वामी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए पुन्हा सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील आहे. काँग्रेस-डीएमके आघाडीशी त्यांची थेट लढत होत असून, सुमारे ९.४४ लाख मतदार आज मतदान करत आहेत. रंगस्वामी पाचव्यांदा मुख्यमंत्रीपद मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.
या सर्व निवडणुकांचे निकाल ४ मे रोजी जाहीर होणार आहेत. याच दिवशी पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकांचे निकालही घोषित केले जातील. तामिळनाडूमध्ये २३ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे, तर पश्चिम बंगालमध्ये २३ आणि २९ एप्रिल अशा दोन टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.आता या निवडणुकांमधून मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

