काटोल: महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे रविवारी सकाळी घडलेल्या भीषण औद्योगिक दुर्घटनेने परिसर हादरला. राऊळगावमधील एसबीएल कंपनीत झालेल्या प्रचंड स्फोटात किमान १५ कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अनेक जण गंभीर जखमी असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
काम सुरू होताच स्फोट-
मिळालेल्या माहितीनुसार सकाळी सुमारे सहा ते सातच्या दरम्यान हा स्फोट झाला. संबंधित कंपनीत खाणकामासाठी वापरल्या जाणाऱ्या डेटोनेटरसह विविध स्फोटक साहित्याची निर्मिती केली जाते. नेहमीप्रमाणे कर्मचारी कामावर हजर झाल्यानंतर उत्पादन प्रक्रियेदरम्यान अचानक जोरदार स्फोट झाला. स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू गेला.
स्फोटाची तीव्रता इतकी होती की कारखान्याच्या एका युनिटचा काही भाग कोसळला. आकाशात दाट धुराचे लोट पसरल्याने आसपासच्या गावांमध्ये घबराट पसरली.
२५ ते ३० कामगार उपस्थित-
घटनेच्या वेळी संबंधित विभागात अंदाजे २५ ते ३० कर्मचारी कार्यरत होते. स्फोटानंतर लागलेल्या आगीमुळे आणि कोसळलेल्या मलब्यामुळे काही जण आत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत १५ जखमींना बाहेर काढून नागपूर येथील शासकीय व खासगी रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
बचावकार्य वेगात-
घटनेची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथके घटनास्थळी दाखल झाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले असून स्फोटाच्या कारणांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. कारखान्यात सुरक्षाविषयक नियमांचे पालन झाले होते का, याचाही तपास केला जाणार आहे.
परिसरात भीतीचे वातावरण-
या भीषण स्फोटानंतर राऊळगाव व परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमले होते. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. जखमींच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली असून या दुर्घटनेने पुन्हा एकदा स्फोटक कारखान्यांतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

