नागपूर : शहरातील अजनी परिसरात उघडकीस आलेल्या एका थरारक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जुन्या वैमनस्यातून २२ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. विशेष म्हणजे, या हल्ल्यामागे अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जादूमहाल चौक परिसरात ही घटना घडली. सुमारे १० ते १२ अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने दोन तरुणांना लक्ष्य करत अचानक हल्ला चढवला. काठ्या, लोखंडी रॉड आणि चाकूच्या सहाय्याने करण्यात आलेल्या या हल्ल्यात सागर गिरीधर सलामे (२२) याचा जागीच मृत्यू झाला. सागर हा साप्ताहिक बाजारात भाजी विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.
प्राथमिक माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी सागर आणि एका अल्पवयीन मुलामध्ये किरकोळ वाद झाला होता. त्याचाच बदला घेण्यासाठी आरोपींनी हा कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेच्या दिवशी ‘महाप्रसाद’च्या बहाण्याने सागरला जादूमहाल चौकात बोलावण्यात आले. तो आपल्या मित्र हर्षल उर्फ अॅलेक्स शिंदेसह तेथे पोहोचताच दबा धरून बसलेल्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला.
हल्ल्यातून जीव वाचवण्यासाठी सागरने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी त्याचा पाठलाग करत नंदिनी मेडिकल स्टोअर परिसरात पुन्हा हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत तो कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला हर्षल शिंदेही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
या प्रकरणी अजनी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून जवळपास डझनभर अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान मुख्य आरोपीने आधीपासूनच हल्ल्याचे नियोजन केल्याचे उघड झाले आहे. तसेच त्याने ऑनलाइन माध्यमातून शस्त्र मागविल्याची माहितीही समोर आली आहे.
या घटनेमुळे शहरात अल्पवयीनांमधील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

