नवी दिल्ली : लोकसभेत महिला आरक्षणासंबंधीचे विधेयक मंजुरीपासून दूर राहिल्याने केंद्रातील राजकारण तापले असून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज रात्री साडे आठ वाजता देशवासियांशी संवाद साधणार आहेत.
आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. बैठकीदरम्यान, विधेयक फेटाळले जाण्यामागे विरोधी पक्षांचा नकारात्मक पवित्रा कारणीभूत असल्याचे मत पंतप्रधानांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. महिलांच्या हक्कांबाबत विरोधकांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करत त्यांनी त्यांना अप्रत्यक्ष इशाराही दिला.
मंत्रिमंडळात बोलताना, विरोधकांनी घेतलेली भूमिका चुकीची असून त्याचे राजकीय परिणाम पुढील काळात दिसून येतील, असेही मोदी यांनी स्पष्ट केले. महिलांविषयी विरोधकांची भूमिका जनतेसमोर मांडण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
लोकसभेत सादर करण्यात आलेल्या या घटनादुरुस्ती विधेयकासाठी दोन-तृतीयांश बहुमत आवश्यक होते. मात्र, मतदानात २९८ सदस्यांनी पाठिंबा दर्शवला, तर २३० सदस्यांनी विरोध केला. आवश्यक बहुमत न मिळाल्याने विधेयक नामंजूर ठरले, ज्यामुळे मोदी सरकारसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. “एनडीएसाठी हा अत्यंत निराशाजनक दिवस असून सरकारला मोठा फटका बसला आहे,” असे त्यांनी म्हटले. हा मुद्दा केवळ महिला आरक्षणापुरता मर्यादित नसून मतदारसंघ फेररचनेशीही संबंधित असल्याचा दावा त्यांनी केला.
महिलांना त्यांचे अधिकार तातडीने मिळावेत आणि २०२३ मध्ये मंजूर करण्यात आलेला कायदा लवकरात लवकर लागू करावा, अशी मागणीही त्यांनी केली. महिलांच्या सशक्तीकरणासाठी घोषणांपेक्षा प्रत्यक्ष कृती महत्त्वाची असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.

