नागपूर : पशुवैद्यक, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या कणा असलेल्या क्षेत्रांना बळकटी देण्यासाठी नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. अग्रिव्हिजन आणि महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ११ व १२ एप्रिल २०२६ दरम्यान नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयात हा परिसंवाद होत आहे.
केंद्रीय पशुसंवर्धन राज्यमंत्री सत्य पाल सिंग बघेल यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी कुलगुरू डॉ. नितीन पाटील, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संयुक्त संघटन सचिव देवदत्त जोशी, भारतीय पशुवैद्यक परिषदेचे अध्यक्ष डॉ. उमेश चंद्र शर्मा, राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. के. बेहेरा, संचालक शिक्षण व अधिष्ठाता डॉ. शिरीष उपाध्ये, अग्रिव्हिजनचे राष्ट्रीय संयोजक मनीष फाटे आणि आयोजन संयोजक शिवम दुबे आदी मान्यवर उपस्थित होते.
“एकात्मिक एकल आरोग्य दृष्टिकोन : ग्रामीण सुदृढतेसाठी पशुवैद्यक, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रांचे बळकटीकरण” या महत्त्वपूर्ण विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, देशभरातील पशुसंवर्धन, दुग्ध तंत्रज्ञान आणि मत्स्य विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनीच या परिसंवादाचे नियोजन केले आहे. देशातील २३ राज्यांमधील २७ विद्यापीठांमधून ४०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग या उपक्रमात दिसून येत आहे.
उद्घाटनप्रसंगी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री बघेल यांनी परिसंवादाच्या विषयाचे आणि विद्यार्थ्यांच्या पुढाकाराचे कौतुक केले. शेतीच्या आधुनिकीकरणामुळे बैलांचे घटते महत्त्व लक्षात घेता, लिंग वर्गीकृत वीर्याच्या वापरातून अधिकाधिक मादी बछड्यांचा जन्म व्हावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात विकसित देशांच्या धर्तीवर शंभर टक्के मादी बछड्यांचा जन्म भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साध्य करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले.
परिसंवादात राजस्थान, आसामसह विविध राज्यांतील पशुवैद्यक विद्यापीठांचे कुलगुरू, संशोधन संस्थांचे संचालक, तसेच विविध तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. यामध्ये डॉ. सुमंत व्यास, डॉ. निरंजन कलिता, डॉ. बारबुद्धे, डॉ. डी. एस. मीना, डॉ. सुधाकर पांडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच विद्यापीठाचे संशोधन, विस्तार शिक्षण विभागाचे अधिकारी, प्राध्यापक आणि पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
हा परिसंवाद ग्रामीण विकास, पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील नव्या संधी, तंत्रज्ञान आणि धोरणांवर मार्गदर्शन करणारा ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

