अलिबाग : अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावात जमिनीच्या वादातून हाणामारी झाल्याचा दावा करण्यात येत असून, या प्रकरणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर दिसत असल्याचा दावा करण्यात येत असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार Sanjay Raut यांनी विधानसभाध्यक्षांवर गंभीर आरोप करत मोठा इशारा दिला आहे. “जर आणखी माहिती बाहेर काढली तर विधानसभाध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल,” असे वक्तव्य त्यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
राऊत म्हणाले की, व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण होतात. “मी अलिबागचाच आहे. मला त्या भागातील परिस्थितीची पूर्ण माहिती आहे. पुढे बोलायला लावू नका. योग्य वेळी सर्व माहिती समोर आणली तर मोठा भडका उडेल,” असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी त्यांनी क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे चेअरमन जक्षय शाह यांचे नाव घेत अलिबागमधील जमीन खरेदी व्यवहारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
दरम्यान, राहुल नार्वेकर यांनी या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. सोशल मीडियावर स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, ते त्यांच्या शेतजमिनीवर जात असताना दोन शेतकऱ्यांमध्ये वाद सुरू असल्याचे दिसले. त्यांनी केवळ त्यांना शांततेने वाद मिटवण्याचा सल्ला दिला आणि पुढे निघून गेले. संबंधित वादाशी किंवा कथित हाणामारीशी आपला कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या व्हिडीओनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला असून, अलिबागमधील जमीन व्यवहार आणि स्थानिक राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणात पुढे काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



