अमरावती : मध्यरात्रीच्या सुमारास अमरावती–परतवाडा मार्ग आणि चांदूर बाजार रोड परिसरात घडलेल्या एका विचित्र घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. रस्त्यालगतची हिरवीगार झाडे अचानक पेट घेतल्याने नागरिकांमध्ये भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, झाडे पूर्णपणे ताजी आणि हिरवी होती. सामान्यतः अशी झाडे पेट घेणे अवघड असते. त्यामुळे ही आग नैसर्गिक नसून कुणीतरी जाणीवपूर्वक लावली असावी, असा संशय अधिक बळावत आहे.
आगीच्या ज्वाळांनी काही अंतरावरील झाडांनाही वेढा घातला. घटनेनंतर परिसरात नागरिकांची गर्दी उसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र अनेक झाडे जळून खाक झाली असून पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले आहे.
तज्ज्ञांच्या मते, तीव्र उष्णता, कोरडी गवताळ जमीन किंवा निष्काळजीपणे फेकलेले जळते पदार्थ यामुळे आग लागण्याची शक्यता असली तरी हिरव्या झाडांना लागलेली ही आग संशयास्पद ठरत आहे.
दरम्यान, या घटनेमागील खरे कारण शोधून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. प्रशासनाकडून तपासाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, ‘हिरव्या झाडांना ही आग’ नेमकी कशी लागली, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



