नवी दिल्ली : अमेरिकेतील कुख्यात गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी संबंधित कथित ‘एपस्टीन फाइल्स’चा मुद्दा संसदेत उपस्थित केल्यानंतर केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर तीव्र टीका केली आहे. “राहुल गांधींनी आता मोठे होण्याची गरज आहे,” अशा शब्दांत पुरी यांनी त्यांच्या राजकीय परिपक्वतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
दिलेल्या मुलाखतीत पुरी म्हणाले की, एपस्टीन प्रकरणातील काही ईमेल्समध्ये आपले नाव आल्याबाबत त्यांनी यापूर्वीच स्पष्टीकरण दिले आहे. लाखो कागदपत्रांपैकी काही निवडक ईमेल्सचा संदर्भ देत आरोप करण्यात आले, असे ते म्हणाले. “जर राहुल गांधींनी संपूर्ण स्पष्टीकरण नीट वाचले असते, तर संसदेत अशी भूमिका घेतली नसती,” असा टोला त्यांनी लगावला.
राहुल गांधींच्या भूमिकेला “हावभावाचे राजकारण” असे संबोधत पुरी यांनी संसदेत मुद्दे मांडताना सखोल अभ्यास आणि तथ्यांची गरज असल्याचे सांगितले. “संसद हे गंभीर चर्चेचे व्यासपीठ आहे. केवळ आरोप करून नंतर चर्चेला टाळणे योग्य नाही,” असे ते म्हणाले.
दरम्यान, अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेलाही पुरी यांनी प्रत्युत्तर दिले. भारताच्या प्रगतीबाबत विरोधकांना अस्वस्थता वाटत असल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर करण्यात येणाऱ्या टीकेचाही त्यांनी समाचार घेत, “पंतप्रधानांवर शरणागतीचे आरोप करणे वास्तवाशी विसंगत आहे,” असे स्पष्ट केले.
एपस्टीन फाइल्स आणि व्यापार करार या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.



